वांद्रे टर्मिनसवर अज्ञात हल्लेखोराच्या अ‍ॅसिड हल्ल्यात बळी पडलेल्या प्रीती राठी (२४) या तरुणीच्या हत्या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखा नव्याने करणार आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर रेल्वेकडून हा तपास मुंबई गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता. त्यासाठी २० जणांचे विशेष पथक बनविण्यात आले आहे. ‘‘या प्रकरणाचा आम्ही सुरुवातीपासून आणि नव्याने तपास करणार आहोत. या आधीच्या तपासात काही कच्चे दुवे राहिले आहेत का ते प्रामुख्याने तपासले जाणार आहे,’’ असे दरोडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रफुल्ल भोसले यांनी सांगितले.