अनेक ठिकाणी गटारांवरील झाकणे गायब; महापालिकेचे दुर्लक्ष
समीर कर्णुक

मुंबई : महानगरपालिकेच्या निष्काळजीमुळे दरवर्षी गटारात पडून एका तरी मुंबईकराला आपला जीव गमवावा लागत आहे. तरीदेखील पालिकेला जाग काही येत नसल्याचे चित्र आहे. पूर्व उपनगरांतील अनेक भागांमध्ये गटारावरील झाकणे गायब असून एखादा अपघात घडल्यावर झाकणे बसवणार का, असा प्रश्न नागरिकांकडून केला जात आहे.

पालिका दरवर्षी शहरातील गटारांची साफसफाई आणि डागडुजीवर कोटय़वधी रुपये खर्च करते. मात्र या सर्व कामांमध्ये मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याने ही कामे निकृष्ट दर्जाची केली जातात. त्यामुळे काही महिन्यांतच गटारांची दुरवस्था होते, तर मॅनहोलवर टाकण्यात येणारी झाकणेही निकृष्ट दर्जाची असल्याने काही दिवसांतच ही झाकणे तुटून जातात. याचा फटका सर्वसामान्य मुंबईकरांना सहन करावा लागतो. दरवर्षी पावसाळ्यात मुंबईमध्ये उघडय़ा गटारांमध्ये पडून अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे, तरीही पालिका आणि पालिका अधिकारी त्यातून धडा घेताना दिसत नाही.

पूर्व उपनगरातील चेंबूरचा सिंधी सोसायटी हा परिसर उच्चभ्रू परिसर म्हणून ओळखला जातो. या परिसरातील सर्वच पदपथावरील गटारांची झाकणे तुटलेल्या अवस्थेत आहेत. या परिसरात दरवर्षी पाणी भरत असल्याने पादचारी पदपथाचा वापर करतात. मात्र गटारावरील झाकणेच गायब असल्याने या ठिकाणी अपघात होण्याची भीती अधिक आहे. काही ठिकाणी नव्याने बनवण्यात आलेल्या गटारांवरही झाकणे नसल्याचे दिसून आले.

अशीच परिस्थिती चेंबूर स्वस्तिक चेंबर परिसर आणि एम पूर्व कार्यालयाजवळ असलेल्या देवनार पशुवधगृह परिसराची आहे. पालिका कार्यालय हाकेच्या अंतरावर असताना पशुवधगृह परिसरातील अनेक ठिकाणी गटारांवरील झाकणे गायब आहेत. तसेच घाटकोपर मानखुर्द लिंक रोडवरही अनेक ठिकाणी झाकणे गायब आहेत. विक्रोळीतील राजर्षी शाहू महाराज क्रीडांगण परिसरातही अनेक पदपथावरील झाकणे गायब आहेत. पूर्व द्रुतगती मार्गावरील घाटकोपर गरोडिया नगरजवळही अनेक ठिकाणी गटारे उघडी आहेत, तर शिवाजीनगर पोलीस ठाण्यासमोर संपूर्ण गटारच उघडे असल्याने याठिकाणी अपघात होण्याची शक्यता आहे.

काही दिवसांपूर्वी भांडुप येथे दोन महिला गटारात पडल्याची चित्रफीत समाजमाध्यमावरून प्रसारित झाली होती. त्यानंतर तात्काळ सर्व गटारावरील झाकणे बसवण्यात येतील, असा दावा महापौर किशोरी पेडणेकर यांनी केला होता. प्रत्यक्षात पूर्व उपनगरांतील अनेक भागांत गटारे उघडीच असल्याचे चित्र आहे.

दरवर्षी उघडय़ा गटारांत पडण्याच्या घटना

तीन वर्षांंपूर्वी तुर्भे परिसरात उघडय़ा गटारात पडून तीन वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला होता, तर चेंबूरच्या ठक्करबाप्पा कॉलनीत एका तरुणाचा गटारात बुडून मृत्यू झाला होता. गेल्या वर्षी घाटकोपरच्या असल्फा परिसरात राहणारी शीतल भानुशाली (वय ३२) ही महिला दळण घेऊन येत असताना उघडय़ा गटारात पडली होती. त्यानंतर दोन दिवसांनी या महिलेचा मृतदेह वरळी समुद्रकिनारी आढळमून आला होता.