“आपल्या मतांची विभागणी न होवू देता आपण जागा वाटपामध्ये यशस्वी झालो, तर जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका महाविकास आघाडीकडे यायला निश्चितपणे मदत होईल.” असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना मांडले.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका स्वतंत्रपणे लढवणार असल्याचे विधान प्रत्येक पक्षाच्या नेत्यांनी केले आहे. कुणी काय विधान करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न व अधिकार आहे. पण उद्याच्या निवडणुकांना सामोरे जात असताना प्रत्येक जिल्ह्यातील राजकीय व भौगोलिक परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे तिघांनी एकत्रित येऊन निवडणूक लढवायची की दोघांनी की, स्वतंत्र लढवायची हा तिथल्या जिल्हयाला अधिकार द्यावा. असेही अजित पवार यांनी सांगितले.

आपण इथे बसून ठरवलं तर उदाहरणार्थ गडचिरोली, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर इथली परिस्थिती काय असते? ते माहित नसते. आपण त्यांच्यावर सोडलं तर ते या सगळ्याचा विचार करतात असेही अजित पवार म्हणाले. तिथले लोक रोज राजकारण आणि समाजकारण करत असतात त्यामुळे त्यांनी निर्णय घ्यावा. परंतु सध्या तरी प्रत्येकजण आपापला पक्ष वाढण्याच्यादृष्टिने प्रयत्न करतोय, असेही अजित पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची काल मुंबईत बैठक पार पडली. या बैठकीत अध्यक्ष शरद पवार यांनी मार्गदर्शन केलं. या बैठकीत राज्यातील आगामी निवडणुका, निवडणुकांची रणनिती, ओबीसींचं राजकीय आरक्षण या विषयांवर चर्चा झाली. तसेच बैठकीत काही आजी माजी आमदारांनी तक्रारी मांडल्या. सत्तेत असलेले शिवसेना आणि काँग्रेस मतदारसंघातील कामं करत नसल्याची तक्रार त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे केली. दरम्यान, यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेते, कार्यकर्त्यांच्या नाराजीचे अजित पवारांनी सांगितले कारण

अजित पवार म्हणाले, “राष्ट्रवादीच्या मिटींगध्ये पराभूत उमेदवारांना बोलावलं होतं. तसेच आमदारांनाही बोलावलं होतं. आमदारांची कामे करण्याचा प्रयत्न आम्ही सगळेजण करण्याचा प्रयत्न करत आहोत. मात्र पराभूत उमेदवार असं म्हणाले की त्यांना विकासकामे करण्यासाठी निधी कमी प्रमाणात मिळतो. ही त्यांची अडचण आहे.”