करोनाचा एकही रुग्ण अद्याप नाही; स्वयंशिस्त, करोनाविषयक जनजागृतीचा परिणाम जयेश शिरसाट, लोकसत्ता मुंबई : करोना संसर्गाने मुंबई बेहाल असली तरी या शहराच्या कुशीत वसलेले आदिवासी पाडे मात्र ठणठणीत आहेत. शिस्त, कडक सोवळे आणि मर्यादित गरजांच्या जोरावर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, आरे वसाहत, गोराई-मढ, मुलुंड, भांडुपमध्ये पसरलेल्या पाडय़ांवरील एकही आदिवासी अद्याप बाधित झालेला नाही. विशेष म्हणजे शासनाचा एकही प्रतिनिधी किं वा लोकप्रतिनिधी या पाडय़ांवर फिरकलेला नाही. राष्ट्रीय उद्यानात ५६, आरे वसाहतीत २७, मढ आणि गोराई गावांत १२ ते १५ आणि मुलुंड, भांडुपमध्ये उर्वरित आदिवासी पाडे आहेत. प्रत्येक पाडय़ावर ७५ ते १५० घरे आणि ५०० ते १५०० आदिवासींची वस्ती आहे. कधीकाळी पूर्णपणे जंगलावर अवलंबून असलेले हे पाडे आता बऱ्याच प्रमाणात शहरावर अवलंबून आहेत. येथील बहुतांश तरुण शहरी भागात जाऊन हर प्रकारची मजुरी करतात, तर महिला घरकाम. शिवाय रानभाजी, फळे किंवा वाडीत पिकवलेला भाजीपाला शहरात विकतात. चाफ्याच्या पाडय़ावर वास्तव्य करणाऱ्या आशा गावित यांनी दिलेल्या माहितीनुसार टाळेबंदीत शिधावाटप केंद्रावरून धान्य मिळाले, ते अपुरे पडते हे लक्षात आल्यावर स्वयंसेवी संस्थांनी प्रत्येक पाडय़ावर पुरेसा धान्यसाठा पोहोचवला. बाकी वाडीत पिकवलेला भाजीपाला आहेच. त्यावर दोन वेळची चूल पेटते. येथील आदिवासींच्या न्याय्यहक्कांसाठी १९८३ मध्ये प्रा. विठ्ठल लाड यांनी श्रमिक मुक्ती आंदोलन चळवळ सुरू के ली. येथील प्रत्येक आदिवासी पाडय़ावर प्रा. लाड यांनी सुरू के लेल्या कष्टकरी शेतकरी संघटनेचे केंद्र, बालवाडी आणि सक्रि य कार्यकर्त्यांचे जाळे आहे. त्यातल्याच ६० कार्यकर्त्यांना करोनाबाबत जागरूक करण्यात आले. करोना संसर्ग कसा होतो, लक्षणे, उपचार, घ्यावयाची काळजी याबाबत कार्यकर्त्यांनी पाडय़ांवर जनजागृती केली. प्रत्येक पाडय़ावर नियमित बैठका घेऊन मुखपट्टी, बाहेरून आल्यावर शारीरिक स्वच्छता, अंतरनियम पाळले जातात का याची चाचपणी होते. परवडत नसल्याने सॅनिटायझरचा गंध आदिवासी पाडय़ांना नाही; पण कडुलिंबाचा पाला किं वा निलगिरीच्या कडकडीत पाण्यात आंघोळ बाहेरून आलेला प्रत्येक जण न चुकता करतो. त्याशिवाय घरात घेतले जात नाही. जेवणही वाढले जात नाही. करोनाचा शिरकाव झालेला नसला तरी प्रत्येकाच्या चेहऱ्यावर मुखपट्टय़ा दिसतात. सुखदु:खाच्या प्रसंगांबाबतही इथल्या आदिवासी पाडय़ांवर जागरूकता आढळते. के ल्टी पाडय़ात राहाणाऱ्या प्रेशीत वैजल या तरुणाचे आठवडय़ाभरापूर्वी लग्न झाले. दोन्हीकडचे मिळून २० नातेवाईकांच्या उपस्थितीत विधी पार पडले. एरव्ही आदिवासींमध्ये आठवडाभर हळदीचा विधी सुरू असतो. हे सारे विधी एका दिवसात आटोपण्यात आले. नातेवाईकांना लांबूनच आशीर्वाद द्या, रागावू नका, अशी विनंती के ल्याचे प्रेशितने सांगितले. या काळात पाडय़ांवर दोन ते तीन जणांचा मृत्यू झाला. प्रत्येकाच्या अंत्ययात्रेत मोजक्या व्यक्ती उपस्थित होत्या, अशी माहिती बारक्या वरठे, बाबू लोके यांनी दिली. आदिवासींचे जीवन निसर्गानुरूप, परिस्थितीनुरूप आहे. करोनाकाळात येथील बहुतांश आदिवासींनी बाहेरच्या जगाशी संबंध तोडले, टाळेबंदी काटेकोरपणे पाळली, स्वयंस्फू र्तीने उपाययोजना के ल्या. त्यामुळे एकाही पाडय़ावर करोनाचा शिरकाव नाही. - सुप्रिया चव्हाण, प्रकल्पाधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास विभाग