भीमा कोरेगाव हिंसाचारप्रकरणी नक्षलवाद्यांशी संबंध असल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेले गौतम नवलखा आणि आनंद तेलतुंबडे यांना मुंबई हायकोर्टाने तात्पुरता दिलासा देत १ नोव्हेंबरपर्यंत अटक न करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी पुण्यात दाखल झालेला गुन्हा रद्द करावा यासाठी दोघांनीही मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी झाली.

आपल्याविरोधात कुठलाही पुरावा नसताना गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आपल्यावरील गुन्हा रद्द करण्यात यावा अशी मागणी गौतम नवलखा यांनी मुंबई हायकोर्टात केली होती. या याचिकेवर सुनावणी दरम्यान हायकोर्टाने त्यांना १ तात्पुरता दिलासा देत १ नोव्हेंबरपर्यंत अटकेची कारवाई करु नये असे आदेश दिले.

दरम्यान, नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली प्रा. वरवरा राव, सुधा भारद्वाज, अरुण परेरा, वर्नन  गोन्साल्विस आणि गौतम नवलखा यांना पुणे पोलिसांनी २८ ऑगस्ट रोजी छापेमारी करीत अटक केली होती. मात्र, आपल्यावर केलेली अटकेची कारवाई बेकायदा असल्याचे सांगत यातील काही जणांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने हा विरोधी विचारांना दडपण्याचा प्रकार असल्याचे सांगत त्यांच्या अटकेवर आक्षेप घेत सर्वांना नजरकैदेत ठेवण्याचे आदेश दिले होते. त्याचबरोबर या प्रकरणी तपास करणाऱ्या पोलिसांच्या तपासकार्यात हस्तक्षेपाला सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला होता. तसेच अन्य कोर्टांमध्ये दाद मागण्याला परवानगी दिली होती.

दरम्यान, या प्रकरणी सुधा भारद्वाज, अरुण परेरा, वर्णन गोन्साल्विस या तिघांचा जामीन अर्ज पुणे कोर्टाने शुक्रवारी फेटाळला. हे तिघेही सध्या नजरकैदेत असून आज ही नजरकैद संपणार असल्याने त्यांच्या अटकेची शक्यता आहे. त्यामुळे ७ दिवसांसाठी आपली नजरकैद वाढवण्यात यावी यासाठी या तिघांनी पुण्याच्या सत्र न्यायालयात अर्ज केला आहे.