नायर रूग्णालयातील एमआरआय मृत्यू प्रकरणी डॉक्टर सिद्धांत शहा यांच्यासह दोन कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. रूग्णालयाने बाळगलेल्या अक्षम्य हलगर्जीपणामुळे राजेश मारू या तरूणाचा मृत्यू झाला. नायर रूग्णालयातील एमआरआय मशीनमध्ये खेचले गेल्याने त्याचा मृत्यू झाला. आता याप्रकरणी डॉक्टरसह तिघांना अटक करण्यात आली आहे.

नेमके काय घडले?
राजेश मारूची आई आजारी असल्याने त्यांना एमआरआय चाचणी करण्याची सुचना डॉक्टरांनी केली होती. त्यानुसार, नायर रुग्णालयातील एमआयआर रुमममध्ये तो आईला घेऊन गेला. येथे रुमबाहेर वॉर्डबॉयने राजेशच्या गळ्यातील सोन्याची साखळी आणि घड्याळ सुरक्षेसाठी काढून घेतले होते. मात्र, रुग्णासाठीचा ऑक्सिजन सिलेंडर त्याला आत घेऊन जाण्यास सांगण्यात आले. सुरुवातीला त्याने विरोध केला मात्र, वॉर्डबॉयने सांगितले की एमआरआय मशीन बंद असून अद्याप सुरु करण्यात आलेले नाही.

त्यानंतर राजेश रुममध्ये गेला आणि एमआरआय मशिनने तत्काळ सिलेंडरला आपल्याकडे खेचून घेतले. सिलेंडरला पकडून राजेशही या मशिनमध्ये अडकला गेला. मशिनमध्ये खेचले गेल्याने उच्च दाबामुळे त्या सिलेंडरचे झाकण उघडले गेले आणि त्यातील संपूर्ण वायू हा राजेशच्या पोटात गेला. वॉर्डबॉयच्या मदतीने राजेशच्या नातेवाईकांनी त्याला मशिनमधून बाहेर ओढण्याचा प्रयत्न केला. त्याला बाहेर काढण्यात आले आणि ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला होता.

या मृत्यू प्रकरणी डॉक्टर शहा आणि इतर कर्मचाऱ्यांवर हलगर्जीपणाचा गुन्हा आज दुपारीच दाखल करण्यात आला होता. काही वेळापूर्वी या तिघांना अटक करण्यात आली. ‘एबीपी माझा’ने या संदर्भातले वृत्त दिले आहे.