मुंबईत केईएम रुग्णालयातील प्रकार; बालकही दगावले

शैलजा तिवले, लोकसत्ता

मुंबई : केईएम रुग्णालयातील अतिदक्षता विभागाच्या ऑक्सिजन पुरवठा यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे गेल्या मंगळवारी ऑक्सिजनची पातळी कमी होऊन तीन गंभीर करोना रुग्णांचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे. त्याच वेळी अतिदक्षता विभागातील एक नवजात बालकही ऑक्सिजनअभावी दगावल्याचे समजते.

‘केईएम’मधील अतिदक्षता विभाग (आयसीयू) आणि नवजात बालकांच्या अतिदक्षता विभागात (एनआयसीयू) १३ हजार किलोलीटर क्षमतेच्या टाकीतून होणारा प्राणवायूचा पुरवठा मंगळवारी अचानक कमी झाला. अतिदक्षता विभागातील डॉक्टरांची धावपळ उडाली. ऑक्सिजन पुरेशा प्रमाणात मिळणे कमी झाल्याने तेथील गंभीर अवस्थेतील, कृत्रिम श्वसनयंत्रणेवरील रुग्णांची प्रकृती आणखी ढासळली. अनेक रुग्णांना वेगवेगळ्या पद्धतीने ऑक्सिजनचा पुरवठा करून त्यांची प्रकृती स्थिर करणे आणि दुसरीकडे बिघाड दुरुस्तीसाठी पाठपुरावा करणे अशी तारेवरची कसरत डॉक्टरांना करावी लागली.  कक्ष क्रमांक२२ मधील अतिदक्षता विभागातील काही करोना रुग्णांची प्रकृती अतिगंभीर होती.  काही रुग्ण कृत्रिम श्वसनयंत्रणेवर होते. ऑक्सिजनचा पुरवठा काही वेळेतच पूर्ववत करण्यात आला, परंतु तोपर्यंत कृत्रिम श्वसनयंत्रणेवरील तीन रुग्णांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

बिघाड नेमका कशामुळे ? ऑक्सिजन पुरवठा योग्य प्रमाणात होत नसल्याचे लक्षात येताच मुख्य पोर्टमधून पुरवठा करणाऱ्या ऑक्सिजन वाहिन्या बाहेर काढण्यात आल्या. त्या बाहेर काढताच त्यांतून पाणी बाहेर आले. वाहिन्या पुन्हा जोडताच ऑक्सिजन पुरवठा सुरळीत झाला. बिघाडामुळे ऑक्सिजन वाहिन्यांमध्ये पाणी साचल्याने त्याच्या पुरवठय़ावर परिणाम झाला असावा, असा अंदाज आहे.

बिघाड झालाच नाही : डॉ. हेमंत देशमुख

केईएममध्ये ऑक्सिजन पुरवठय़ामध्ये कोणताही तांत्रिक बिघाड झालेला नाही. सध्या ४३०हून अधिक खाटांना ऑक्सिजन पुरवठा सुरू आहे. असे झाले असते तर सर्व रुग्णांची प्रकृती खालावली असती, असे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी स्पष्ट केले. ऑक्सिजनची टाकी २० टक्के रिकामी झाली की लगेचच भरली जाते. त्यामुळे ऑक्सिजन अपुरा पडण्याची शक्यता नाही. तरीही रुग्णांच्या वाढत्या संख्येनुसार आणखी एक १३ हजार किलोलिटरची टाकीही बसविण्यात येणार असल्याचे डॉ. हेमंत देशमुख यांनी सांगितले.