दोन मुली गंभीर जखमी, मानखुर्दमधील अपघात; आरोपीस अटक कार चालविण्यास शिकण्याच्या प्रयत्नात एक तरुणाने तीन शाळकरी मुलांना चिरडले. सोमवारी सकाळी सातच्या सुमारास मानखुर्दच्या अण्णाभाऊ साठे नगरात हा अपघात घडला. जखमींमध्ये दोन लहान बहिणींचा समावेश असून दोघी गंभीररीत्या जखमी झाल्या आहेत. याप्रकरणी मानखुर्द पोलिसांनी या तरुणाला अटक केली. तसेच कार मालकाविरोधातही पोलिसांनी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. परिमंडळ सहाचे उपायुक्त शहाजी उमप यांच्या माहितीनुसार तिन्ही मुले घाटकोपर-मानखुर्द जोडरस्त्यावरील मंडाले, रिशीनगर परिसरात राहात होती. सकाळी शाळेत जात असताना अचानक नियंत्रण सुटलेली निसान मायक्रा कार भरधाव वेगात या मुलांच्या दिशेने आली आणि कार तिन्ही मुलांना चिरडून पुढे गेली. हा प्रकार पाहणाऱ्या पादचाऱ्यांनी प्रथम कारचालक सलमान हाजी कुतुबुद्दीन खान या १९ वर्षांच्या तरुणाला ताब्यात घेतले. काहींनी जखमी मुलांना गोवंडीच्या शताब्दी रुग्णालयात दाखल केले. महिमा रामधनी यादव (१२), तिची धाकटी बहीण अंशिका (७) आणि गणेश शंकर यादव (१२) अशी जखमी मुलांची नावे आहेत. यापैकी महिमा सर्वाधिक जखमी झाली. तिच्या दोन्ही पायांचे हाड मोडले आहे, तर अंशिकाच्या एका पायाचे हाड मोडले आहे. या अपघातातून गणेश मात्र थोडक्यात बचावला. त्याच्या उजव्या पायाला किरकोळ जखम झाली आहे. महिमाला सायन रुग्णालयात हलविण्यात आल्याची माहिती मानखुर्द पोलिसांनी दिली आहे. चालक सलमानला भारतीय दंड विधान आणि मोटारवाहन कायद्यातील विविध कलमांन्वये गुन्हा नोंदवून अटक करण्यात आली. गेल्या महिन्यात कुलाब्याच्या नेव्ही नगरात घडलेल्या अपघाताची ही पुनरावृत्ती आहे. कुलाब्याच्या अपघातात अपघातग्रस्त दोन्ही लहान मुलांचा जागीच मृत्यू झाला होता. पाय एक्सलेटरवर.. आरोपीकडे वाहन चालविण्याचा परवाना नव्हता. तो कार शिकत होता. त्याचा पाय ब्रेकऐवजी एक्सलेटरवर पडला आणि कारचा वेग वाढला. कारवरील नियंत्रण सुटले आणि हा अपघात घडल्याची माहिती मानखुर्द पोलिसांनी केलेल्या चौकशीत पुढे आली आहे. सलमानला कार शिकवणाऱ्या मित्राविरोधातही गुन्हा नोंदविण्यात आल्याचे उपायुक्त उमाप यांनी सांगितले.