अपहरणाचा गुन्हा दाखल, शोधमोहीम सुरू

मुंबई : माटुंगा येथील श्रद्धानंद आश्रमातून तीन अल्पवयीन मुली सोमवारी बेपत्ता झाल्या. या प्रकरणी माटुंगा पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा नोंदवून मुलींचा शोध सुरू केला आहे.

जून ते नोव्हेंबर या कालावधीत या मुली वेगवेगळय़ा कारणांमुळे आश्रमात आल्या. नेहमीप्रमाणे सोमवारी पहाटे सर्व मुलींना व्यायामासाठी मैदानात आणण्यात आले. त्यानंतरच्या मोजणीत तीन मुली बेपत्ता असल्याचे आश्रम चालकांना आढळले. त्यांच्या तक्रारीवरून अपहरणाचा गुन्हा नोंदवण्यात आला, अशी माहिती माटुंगा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक भरत भोईटे यांनी दिली.

यापैकी एका मुलीचे यापूर्वीही अपहरण झाले होते. पोलिसांनी तिची सुटका केली आणि आश्रमात आणले. अन्य एका मुलीची आई मनोरुग्ण असून वडील तिचे संगोपन करण्यास असमर्थ आहेत. तिसरी मुलगी आईच्या अर्जावरून आश्रमात वास्तव्य करीत होती.