मानखुर्द परिसरात अल्पवयीन मुलीवर चालत्या गाडीत बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली होती. लिफ्ट देण्याच्या नावाखाली आरोपींनी तिच्यावर बळजबरी केली होती. तसंच या गोष्टीची कुठे वाच्यता केल्यास वाईट परिणाम होतील, असंही तिला धमकावण्यात आलं होतं. २९ जुलै रोजी ही घटना घडली असली तरी नुकतीच ती उघडकीस आली होती. या प्रकरणी तीन आरोपींना अटकही करण्यात आली आहे. याप्रकरणी भाजपा महाराष्ट्र उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी मानखुर्द पोलीस स्थानकाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची भेट घेतली आणि या प्रकरणाची अधिक माहिती जाणून घेतली. तसंच महिला, मुलींच्या सुरक्षेबाबत सरकारला सोयर-सुतक नाही, असं म्हणत त्यांनी सरकारवरही निशाणा साधला. "एकीकडे आपण सर्वजण कोरोना महामारीशी एकजुटीने सामना करत असतानाचं लहान मुली आणि महिलांवरील अत्याचारात झालेली वाढ झालेली वाढ ही अतिशय चिंताजनक आहे. यासंदर्भात पोलिसांची प्रत्यक्ष भेट घेत घटनेची माहिती घेतली. तसंच डीसीपींशीदेखील यासंदर्भात बोलणं झालं. यावेळी पोलिसांनी त्या आरोपींना पकडल्याची माहिती दिली," असं चित्रा वाघ म्हणाल्या. मुंबईत धावत्या कारमध्ये एका अल्पवयीन मुलीवर ३ नराधमांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घडना घडलीये. या संदर्भात मानखुर्द पो॰स्टे॰Sr.Pi ची भेट घेतली.DCPशीं फोनवर चर्चा केली नराधमांना पकडलयं. मागील १० दिवसात लहान मुलींवर अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे.सरकारचे डोळे कधी उघडणार? pic.twitter.com/KQ0b2voPDZ — Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) August 11, 2020 "गेल्या १० दिवसातल्या राज्यातील अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटना, ही मुंबईची घटना, क्वारंटाईन सेंटरमधील घटना या सगळ्यांनीचं राज्यातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. राज्यातल्या माता-भगिनी सुरक्षित नाहीत. सरकारने नवा कायदा आणण्याबद्दल घोषणा केली. तेच आता चालढकलपणा करत आहेत. महिला, मुलींच्या सुरक्षेबाबत सरकारला सोयर-सुतक राहिलेलं नाही. या घटनांवर मुख्यमंत्री,गृहमंत्री चकार शब्द बोलत नाहीत. अशा संवेदनहिन मंडळीना खुर्चीवर बसण्याचा नैतिक अधिकार नाही," असंही त्या म्हणाल्या. काय आहे प्रकरण? २९ जुलै रोजी रात्री पीडित मुलगी आपल्या मावशीकडे जाण्यास निघाली होती. दरम्यान, मुलीला एकटं पाहून आरोपींनी आपली गाडी तिच्याजवळ थांबवली. तसंच तिला तिच्या निर्धारित स्थळी सोडणार असल्याचं सांगितलं. दरम्यान गाडी तिच्या निर्धारित स्थळी न नेता अन्य परिसरात नेण्यात आली. याच दरम्यान चालत्या गाडीत आपल्यावर अत्याचार केले. तसंच या घटनेची कुठे वाच्यता केल्यास तिला जीवे मारण्याचीही धमकी दिली असल्याचं पीडित मुलीनं दिलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत सर्व आरोपींना अटक केली.