|| इंद्रायणी नार्वेकर

दरडोई १८० लिटरपेक्षा जास्त पाणी वापरणाऱ्यांना चाप :- राज्यावर कितीही दुष्काळी संकट असले तरी, २४ तास पाणीपुरवठय़ाचे धनी असलेल्या मुंबईकरांना यापुढे पाण्याच्या उधळपट्टीला चाप बसवावा लागणार आहे. पालिकेच्या नियमानुसार मुंबईत दरडोई १८० लिटर यानुसार पाण्याचे वितरण केले जात असून त्यापेक्षा अधिक पाणी वापरणाऱ्यांना तिप्पट पाणीपट्टी आकारण्याचा विचार महापालिकेने चालवला आहे. त्यामुळे १८० लिटरपेक्षा जास्त पाणी वापरणाऱ्यांना यापुढे थेट हजार लिटरला १५ रुपये हा दर लावला जाणार आहे. पालिका प्रशासनाने तसे धोरण तयार केले असून त्याला प्रशासकीय मंजुरीही मिळाली आहे.

सर्वात श्रीमंत महानगरपालिका अशी ख्याती असलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या मालकीची तुळशी, विहार, तानसा, मोडकसागर, मध्य वैतरणा ही पाच धरणे आहेत, तर भातसा आणि अप्पर वैतरणा ही दोन धरणे राज्य सरकारच्या मालकीची आहेत. ही दोन धरणे बांधताना केलेल्या भांडवली खर्चाच्या सहभागामुळे पालिकेला या धरणातून पाणी मिळते. मुंबईला दर दिवशी ३८०० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा केला जातो. या सातही धरणांची पाणी साठवण्याची क्षमता साडेचौदा लाख दशलक्ष लिटर इतकी आहे. पावसाळ्याचे चार महिने संपले की ऑक्टोबरमध्ये पाणीसाठय़ाचा आढावा घेतला जातो. धरणे पूर्ण भरलेली असतील तर पाणीकपातीची आवश्यकता नसते. मात्र पाऊस कमी पडल्यामुळे नोव्हेंबर २०१८ पासूनच पाणीपुरवठय़ाच्या वेळेत १५ टक्के कपात, तर पाणीपुरवठय़ात १० टक्के कपात करण्यात आली.

भविष्यात मुंबईकरांना पाण्याची चिंता भेडसावू नये म्हणून पाण्याच्या वापरावर र्निबध आणण्याचे पालिका प्रशासनाने ठरवले आहे. सध्या १५० लिटरपेक्षा जास्त पाणी वापरणाऱ्यांची पाणीपट्टी टप्प्याटप्प्याने वाढवण्याची तरतूद आहे. मात्र आता थेट तिप्पट दर वाढणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

नियमानुसार झोपडपट्टीत दरदिवशी दरडोई ४५ लिटर पाणी तर इमारतींमध्ये १३५ लिटर पाणी देणे अपेक्षित आहे. मात्र मुंबईत यापेक्षा जास्तच म्हणजे १६० ते १७० लिटर पाणी दिले जाते, असा प्रशासनाचा दावा आहे.

निवासी जलजोडण्यांना फटका

पालिकेमार्फत झोपडपट्टय़ा, चाळी, इमारती, कारखाने यांना पाणीपुरवठा केला जातो. त्यापैकी व्यापारी जलजोडण्यांना आधीच चढय़ा दराने पाणी दिले जाते, तर झोपडपट्टय़ांना दरडोई १५० लिटरपेक्षाही कमी पाणीपुरवठा होत असतो. त्यामुळे पालिकेच्या या वाढीव पाणीपट्टीचा सर्वात मोठा फटका निवासी इमारतीतील रहिवाशांना बसणार आहे. सध्या निवासी इमारतींना ५.२२ रुपये या दराने पाणीपुरवठा केला जातो. मात्र १८० लिटरपेक्षा जास्त पाणी वापरले, की लगेचच हा दर १५ रुपये होणार आहे. त्यामुळे साहजिकच इमारतींतील रहिवाशांची पाणीपट्टी वाढणार आहे. पाणीपट्टीच्या ७० टक्के मलनिस्सारण कर आकारला जात असतो. त्यामुळे तो करही वाढणार आहे.

पाणीपट्टीचे सध्याचे दर

  •  गावठाण, कोळीवाडे, – ३.९१ रुपये (प्रति १००० लिटर)
  •  गलिच्छ वस्त्या, झोपडपट्टय़ा – ४.३३ रुपये
  •  इमारती – ५.२२ रुपये
  • बिगरव्यापारी संस्था – २०.९१ रुपये

पाण्याचा वापर जपून करण्यासाठी शिस्त लागावी म्हणून हे टेलिस्कोपिक दर आकारण्यात येणार आहेत. सोसायटय़ांना जे मीटर लावले जातात त्यावरून किती पाण्याचा वापर केला ते समजू शकेल. एका घरात पाच व्यक्ती आहेत असे गृहीत धरून किती पाण्याचा वापर केला ते समजू शकेल.

– प्रवीण दराडे, अतिरिक्त आयुक्त