मुंबईत एका तीन वर्षांच्या मुलीची मोबाईल चार्जरच्या वायरने गळा आवळून हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे. या मुलीचे खंडणीसाठी अपहरण करण्यात आले होते. कामाठीपुरा येथील मौलाना आझाद रोड परिसरात मध्यरात्री या मुलीचा मृतदेह आढळला.

मुंबईतील जेनुरा खान ही तीन वर्षांची मुलगी बेपत्ता झाली होती. बेपत्ता झाल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी शोधाशोध केली. त्यानंतर तिच्या कुटुंबीयांकडे १ कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. काल, शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास कामाठीपुरा येथील मौलाना आझाद रोड परिसरात या मुलीचा मृतदेह आढळून आल्याचे वृत्त ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीने दिले आहे. या घटनेबाबत समजताच तिच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. अपहरणकर्त्यांनी तिची मोबाईलच्या चार्जरने गळा आवळून हत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या मुलीची हत्या खंडणीसाठी केल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी दोघा संशयितांना अटक केली आहे. धक्कादायक म्हणजे मारेकरी हे अल्पवयीन आहेत. या प्रकरणी जे. जे. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.