तंबाखू नियंत्रण कायदा, २००३ मधील कलमसहच्या तरतुदीनुसार राज्यभर यापूर्वीच शैक्षणिक संस्थांपासूनच्या १०० मीटर्पयच्या परिसरात तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ विकण्यास बंदी घालण्यात आली होती. याच बंदीची नव्याने अंमलबजावणी करण्यासाठी शासनाने शनिवारी पुन्हा एकदा नव्याने आदेश काढला आहे. शासनच्या आदेशानुसार या नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांना २०० रुपयांपर्यंतचा दंड आकारण्यात येणार आहे. तसेच तंबाखू नियंत्रण कार्यक्रमात उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून तंबाखूच्या आरोग्यावरील परिणामांबाबत जागृती करणारी माहिती अभ्यासक्रमात समाविष्ट केली जाईल, असेही निर्णयात नमूद केले आहे. जागतिक कर्करोग दिनानिमित्त टाटा स्मारक रुगणालयात आयोजित केलेल्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शैक्षणिक संस्थांच्या आवारात तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थाची विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले होते. याचबरोबर तरुणांना या सवयीपासून परावृत्त करण्यासाठी जनजागृती अभियान हाती घेण्याचेही आश्वासन दिले होते. यानुसार हा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. या संदर्भात सर्व संबंधित विभागांनी त्यांच्या अधिपत्याखाली येणाऱ्या शैक्षणिक संस्थांना हे नियम पालन करण्याबाबत सूचित करावे, असेही निर्णयात नमूद करण्यात अले आहे. पण हा निर्णय येण्यापूर्वीच मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनांनंतर विद्यापीठ तसेच शालेय शिक्षण मंडळाने या संदर्भातील परिपत्रक फेब्रुवारी महिन्यातच सर्व शैक्षणिक संस्थांना पोहोचविले आहे.