राज्याचे मुख्यमंत्री उद्धन ठाकरे यांनी १४ एप्रिल रोजी संध्याकाळी ७ वाजेपासून राज्यात लॉकडाऊन लागू केला. मात्र, हा लॉकडाऊन पूर्ण स्वरूपात लागू न करता जीवनावश्यक सेवांसोबतच काही इतर सेवा आणि उद्योगांना देखील यातून सूट देण्यात आली आहे. त्यासोबतच, सामान्य नागरिकांना देखील काही सबळ कारणांसाठी घराबाहेर पडण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र, आता यावरच मुंबईच्या महापौर आणि शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी शहराच्या प्रथम नागरिक म्हणून आपली भूमिका मांडली आहे. “कोविड-१९ ची सध्याची परिस्थिती पाहाता संपूर्ण लॉकडाऊन लागू करायला हवा”, असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन लागू केल्यानंतर विरोधी पक्षांनी लॉकडाऊनवर मोठ्या प्रमाणावर टीका केली आहे.

“कुंभमेळा प्रतिकात्मक ठेवावा”, पंतप्रधान मोदींचा स्वामी अवधेशानंद गिरी यांना फोन..!

 

५ टक्क्यांमुळे ९५ टक्के अडचणीत!

दरम्यान, यावेळी मुंबईतल्या ५ टक्के बेजबाबदार नागरिकांमुळे उरलेल्या ९५ टक्के नागरिकांना अडचण होत असल्याचं महापौर म्हणाल्या. “९५ टक्के मुंबईकर कोविड-१९ च्या नियमांचं पालन करतात. पण ५ टक्के लोकं निर्बंधांचं पालन करत नाहीत. त्यामुळे त्यांच्यामुळे इतरांना अडचण होते. यासाठीच मला वाटतं सध्याची परिस्थिती पाहाता संपूर्ण लॉकडाऊन लागू करायला हवा”, असं महापौर म्हणाल्या आहेत.

 

कुंभमेळ्याहून लोकं प्रसाद घेऊन येतायत!

दरम्यान, यावेळी कुंभमेळ्याहून परत येणाऱ्या नागरिकांना क्वारंटाईन करण्याचा विचार आम्ही करत असल्याचं देखील महापौर किशोरी पेडणेकर यांनी स्पष्ट केलं. “कुंभमेळ्याहून आपापल्या राज्यात जाणारी लोकं सोबत ‘प्रसाद’ म्हणून करोना आणत आहेत. या सर्व लोकांना त्यांच्या त्यांच्या राज्यांमध्ये क्वारंटाईन करायला हवं. त्याचा खर्च त्या लोकांकडूनच घ्यायला हवा. मुंबईत देखील आम्ही कुंभ मेळ्याहून परतणाऱ्या नागरिकांना परतल्यानंतर क्वारंटाईन करण्याचा विचार करत आहोत”, असं पेडणेकर यांनी स्पष्ट केलं.