परिवहनमंत्र्यांचे आश्वासन; आमदारांच्या तक्रारीनंतर दखल जवळच्या अंतरासाठी टॅक्सी-रिक्षाचालकांकडून भाडे नाकारल्यामुळे होणारा मनस्ताप सर्वसामान्यांसाठी रोजचाच आहे. मात्र या त्रासाचा फटका जेव्हा आमदारांनाच बसतो तेव्हा सरकारला जाग येते. विधान परिषदेत आज आमदारांनीच टॅक्सी-रिक्षाचालकांकडून भाडे नाकारण्यात येत असल्याच्या तक्रारी केल्या तेव्हा परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी सर्व टॅक्सी व रिक्षांमध्ये तक्रार करण्यासाठी टोल फ्री क्रमांक लावले जातील असे आश्वासन दिले. राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश गजभिये, आनंद ठाकूर तसेच विद्या चव्हाण यांनी आज विधान परिषदेत आमदारांनाच टॅक्सीवाल्यांकडून कसे भाडे नाकारले जाते याचे किस्से ऐकवले. गोरेगाव येथे रिक्षाचालकांचा त्रास तर खूप मोठा असल्याचे विद्या चव्हाण यांनी सांगितले. वाहतूक पोलीस रिक्षाचालकांच्या मुजोरीवर कारवाई करण्याऐवजी वेगळेच उद्योग करत असतात. अशा वेळी नागरिकांनी तक्रार करायची कोठे असा सवालही आमदारांनी केला. यानंतर रावते यांनी यापुढे सर्व टॅक्सी व रिक्षांमध्ये तक्रारीसाठी टोल फ्री क्रमांक लावणे बंधनकारक करू असे आश्वासन दिले. मुंबई शहरात रिक्षा व टॅक्सीचालकांविरोधात तक्रारी करावयाच्या असल्यास परिवहन विभागातर्फे १८००२२०११० अशी टोल फ्री व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे तसेच ६२४२६६६६ या हेल्पलाइनवरही नागरिक तक्रारी करू शकतात. २०१३ ते २०१७ या कालावधीत रिक्षा व टॅक्सीचालकांविरोधात ५७१९ तक्रारींमध्ये कारणे दाखवा नोटिस बजावण्यात आली. ४२०३ अनुज्ञप्ती निलंबित करण्यात आल्या आहेत. दमबाजी करणारा अधिकारी निलंबित विधान परिषदेत गुटखाबंदीचा विषय मांडला म्हणून विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या कार्यालयात जाऊन दमबाजी करणाऱ्या अन्न व औषध प्रशासन खात्यामधील अन्न सुरक्षा अधिकारी आर. डी. आकरूपे यांना निलंबित करण्याची घोषणा अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी केली. राज्याचे पर्यटन धोरण जाहीर करण्याची मागणी समृद्ध निसर्ग, समुद्र किनारे, ऐतिहासिक स्थळे यांच्यामुळे महाराष्ट्रात पर्यटनाला मोठा वाव आहे. पण त्यासाठी पर्यटन धोरणाची गरज असून राज्य सरकारने लवकरात लवकर राज्याचे पर्यटन धोरण जाहीर करावे, अशी मागणी शिवसेनेचे सुनील प्रभू यांनी विधानसभेत केली.