गावात घर बांधायचे असेल तर आता केवळ ग्रामपंचायतीची नव्हे तर पंचायत किंवा जिल्हा परिषद स्तरावरील नगररचना अधिकाऱ्याची परवानगी बंधनकारक राहणार आहे. ग्रामविकास विभागाने नुकताच तसा आदेश जारी केला आहे. ग्रामीण भागात नवीन घर बांधायचे असेल तर संबंधित ग्रामपंचायतीची परवानगी पुरेशी असते. ग्रामपंचायतीची परवानगी असल्यास पाणी, वीज व अन्य सुविधा मिळण्यास अडचणी येत नाहीत. ग्रामविकास विभागाने आता त्याबाबत वेगळा निर्णय घेतला आहे. ज्या गावांकरिता प्रारुप प्रादेशिक योजना किंवा अंतिम प्रादेशिक योजना जाहीर करण्यात आलेली नाही, अथवा प्रादेशिक योजना अस्तित्वात नाही अशा गावांमधील गावठाण क्षेत्राबाहेर कोणत्याही व्यक्तीस बांधकाम करायचे असल्यास राज्य शासनाच्या नगररचना अधिकाऱ्याची परवानगी घेणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यासाठी महाराष्ट्र ग्रामपंचायत आणि महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना (सुधारणा) कायद्याचा आधार घेण्यात आला आहे.