अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेकडून मान्यता प्रक्रियेच्या नियमांत बदल विद्यार्थ्यांअभावी डबघाईला आलेल्या अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या परिसरात आता कला, वाणिज्य अशा अव्यावसायिक अभ्यासक्रमांची महाविद्यालयेही सुरू होऊ शकणार आहेत. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने पुढील वर्षीच्या मान्यता प्रक्रियेच्या नियमांत बदल केले आहेत. विद्यार्थ्यांअभावी राज्यातील शेकडो अभियांत्रिकी महाविद्यालये बंद पडली आहेत. अनेक महाविद्यालये शेवटच्या घटका मोजत आहेत. मात्र त्यामुळे मोठी गुंतवणूक करून उभ्या केलेल्या महाविद्यालयांच्या परिसराचे काय करावे, असा प्रश्न संस्थाचालकांना पडला आहे. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या नियमानुसार एखादे तंत्रशिक्षण अभ्यासक्रमाचे महाविद्यालय असलेल्या इमारतीचा किंवा परिसराचा वापर इतर अभ्यासक्रम चालवण्यासाठी करता येत नसे. मात्र आता अभियांत्रिकी महाविद्यालयांना पारंपरिक अभ्यासक्रमांसह इतर सर्व अभ्यासक्रम सुरू करता येणार आहेत. परिषदेने पुढील वर्षांच्या नियमावलीमध्ये बदल केला आहे. त्यामुळे येत्या काळात अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये कला, वाणिज्य, विज्ञान, व्यवस्थापन असे कोणतेही अभ्यासक्रम सुरू होऊ शकतात. अभियांत्रिकी अभ्यासक्रम चालवला जात असतानाही इतर अभ्यासक्रम सुरू करता येतील. पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी मोठय़ा प्रमाणावर खर्च केलेल्या शिक्षण संस्थांना यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मात्र त्याच वेळी अभियांत्रिकी महाविद्यालयांची स्वतंत्र ओळख पुसली जाण्याची शक्यता आहे. अभियांत्रिकीबरोबर दुसरे अभ्यासक्रम सुरू करताना संस्थेतील इमारत, मैदान, उपाहारगृह, पार्किंग आणि काही प्रमाणात प्रयोगशाळा या सुविधा वापरता येऊ शकतील. मात्र प्रत्येक अभ्यासक्रमाच्या शैक्षणिक गरजा, आवश्यक सामग्री, शिक्षक अशा सुविधा संस्थेकडे असणे अपेक्षित आहे. अभियांत्रिकी आणि इतर विद्याशाखांच्या महाविद्यालयांतील शिक्षकही स्वतंत्र असणे गरजचेचे आहे. याबाबत परिषदेचे अध्यक्ष डॉ. अनिल सहस्रबुद्धे यांनी सांगितले, ‘महाविद्यालयांकडे असलेल्या सुविधा पडून राहण्यातून काहीच मिळत नाही. इतर विद्याशाखांच्या विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार असेल तर त्यात अडसर असू नये. किंबहुना अभियांत्रिकी महाविद्यालयातील सुविधांचा उपयोग विद्यार्थ्यांना होऊ शकेल.’ दोन वर्षे नवे अभियांत्रिकी महाविद्यालय नाही गरजेपेक्षा जास्त अभियांत्रिकी महाविद्यालयांना दिलेली परवानगी आणि त्याच वेळी अभियांत्रिकी क्षेत्रातील काही शाखांच्या मनुष्यबळाची कमी झालेली मागणी यांमुळे अभियांत्रिकी अभ्यासक्रमाला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद कमी झाला आहे. दरवर्षी अभ्यासक्रमाच्या हजारो जागा रिक्त राहात आहेत. त्या पाश्र्वभूमीवर देशभरात पुढील दोन वर्षे एकाही नव्या अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयाला परवानगी न देण्याचा निर्णय परिषदेने घेतला आहे. ‘याबाबत रेड्डी समितीने अहवाल दिला असून त्यानुसार अभियांत्रिकी महाविद्यालयांना नव्याने परवानगी देण्यात येणार नाही,’ असे परिषदेचे अध्यक्ष डॉ. अनिल सहस्रबुद्धे यांनी सांगितले.