बागा, खेळाच्या मैदानांसाठी ३४७०.६५ हेक्टर भूखंड राखीव

मुंबईतील हरितपट्टा कायम ठेवण्यासाठी किंबहुना वाढवण्याच्या दृष्टीने दरवर्षी पावसाळ्यात १५ हजार झाडे लावण्यात येतील, तसेच प्रस्तावित विकास आराखडय़ात ३४७०.६५ हेक्टर भूखंड हा बागा, खेळाच्या मैदानांसाठी राखून ठेवण्यात येणार असल्याची माहिती पालिकेतर्फे मंगळवारी उच्च न्यायालयात देण्यात आली.

‘मिलीबग’मुळे पर्जन्यवृक्ष झपाटय़ाने नष्ट होत असल्याचा दावा करत त्याबाबत जनहित याचिका केली आहे. त्यात  पालिका या समस्येवर तोडगा काढण्यात अपयशी ठरत असून हे चित्र असेच राहिले तर मुंबईतील हरितपट्टा नष्ट होईल, असा आरोपही केला होता. मुंबईतील हिरवळ कायम ठेवण्याच्या दृष्टीने आवश्यक ते आदेश देण्याची मागणी केली आहे. त्या वेळेस पालिकेच्या वतीने अ‍ॅड्. तृप्ती पुराणिक यांनी प्रतिज्ञापत्र सादर केले. त्यानुसार, मुंबईतील हिरवळ कायम ठेवण्यासाठी किंबहुना त्यात वाढ होण्याच्या दृष्टीने दरवर्षी पावसाळ्यात १५ हजार झाडे लावण्यात येतील, असा दावा करण्यात आला आहे. तसेच आतापर्यंत १२ हजार ३३३ रोपे निवासी संकुल, संस्थांना वितरित करण्यात आली आहेत. याशिवाय राज्य सरकारच्या जुलै महिन्यात राबवण्यात आलेल्या वृक्षरोपणाच्या विशेष मोहिमेतही सक्रिय सहभाग घेतलेला आहे. दरम्यान, न्यायालयाने हे प्रकरण चार आठवडय़ांसाठी तहकूब करत सरकारतर्फे या समस्येवर काय उपाययोजना केल्या जात आहेत याचे उत्तर दाखल करण्यास सांगितले आहे.