मुंबई : गेल्या आठवडय़ात तलावाच्या क्षेत्रात झालेल्या पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणारा तुळशी तलाव भरुन वाहू लागला. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सात तलावांच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत असून त्यापैकी राष्ट्रीय उद्यानात असलेला तुळशी तलाव शुक्रवारी भरुन वाहू लागला. या तलावातून मुंबईला दररोज १८ दशलक्ष लिटर्स पाण्याचा पुरवठा केला जातो. मोडक सागर, अप्पर वैतरणा, भातसा, तानसा, मध्य वैतरणा या पाच प्रमुख तलावांसह तुळशी आणि विहार तलावातील पाणी साठय़ात ६ लाख ३५ हजार ६५९ दशलक्ष लिटर्स पर्यंत वाढ झाली आहे मोडक सागर आणि तानसाच्या पाणी पातळीत वाढ होत असून दोन्ही तलाव भरण्यासाठी पाण्याच्या पातळीत २ ते ३ मिटर वाढ होणे अपेक्षित आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत तलाव क्षेत्रात यंदा पाऊस जास्त होऊनही पाणीसाठा मात्र कमी आहे. पाणी पातळी (मिटरमध्ये) तलावाचे नाव १२ जुलै २०१९ अप्पर वैतरणा ५९४.०३ मोडक सागर १६०.३१ तानसा १२६.०७ मध्य वैतरणा २७२.६० भातसा १२३.३६ विहार ७७.६७ तुळसी १३९.१० भातसाची पातळी १२३ मीटपर्यंत शहराला ८० टक्के पाणी पुरवठा करणाऱ्या भातसा तलावातील पाण्याची पातळी १२३ मिटपर्यंत पोहचली आहे. भातसा तलाव भरण्यासाठी पाण्याची पातळी १४२ मिटपर्यंत वाढणे गरजेचे आहे.