अवघ्या चार महिन्यांत ३६ शहरे स्वच्छ; स्वच्छता मोहिमेत महिला नगराध्यक्षांची आघाडी केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यात राबविण्यात येत असलेल्या स्वच्छ महाराष्ट्र मोहिमे अंतर्गत स्वच्छ शहरांसाठी एक ते दोन कोटी रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी केली. अवघ्या चार महिन्यांत ३६ शहरे हागणदारीमुक्त व स्वच्छ झाली आहेत. विशेष म्हणजे ‘स्वच्छ भारत’ मोहिमेत राज्याला आघाडी मिळवून देणाऱ्या या मोहिमेत महिला नगराध्यक्ष असलेल्या तब्बल २३ नगरपालिकांनी आघाडी घेतली आहे. राज्यात २ ऑक्टोबरपासून स्वच्छ महाराष्ट्र मोहीम (नागरी) सुरू करण्यात आली. अल्पावधीत तिला चांगले यश मिळाले. त्यानिमित्त स्वच्छतेत आघाडी घेणाऱ्या पालिकांचे नगराध्यक्ष, मुख्याधिकारी, महापौर, आयुक्त व इतर पदाधिकाऱ्यांचा बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. नागरिकांनी स्वच्छतेची सवय अंगी बाणवल्यास ‘स्वच्छ भारत’ मोहिमेत महाराष्ट्र हे पहिले स्वच्छ राज्य ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. या वेळी पुण्याचे विभागीय आयुक्त एस. चोकलिंगम, जिल्हाधिकारी सौरभ राव, सोलापूरचे जिल्हाधिकारी तुकाराम मुंडे, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, कोल्हापूर महापालिकेचे आयुक्त पी. शिवशंकरय्या यांचाही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या समारंभाला उद्योग मंत्री सुभाष देसाई, नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, नगरविकास सचिव मनीषा म्हैसकर, नगरपालिका संचालनालयाच्या संचालक मीता लोचन आदी मान्यवर उपस्थित होते. १ मे २०१६ पूर्वी शंभर शहरे हागणदारीमुक्त व २५ शहरे स्वच्छ करण्याचा निर्धार सचिव मनीषा म्हैसकर यांनी बोलून दाखविला. स्वच्छतेसाठीचे प्रोत्साहन अनुदान.. * हागणदारीमुक्त व स्वच्छ होणाऱ्या अ वर्ग नगरपालिकेस २ कोटी. * ब वर्ग नगरपालिकेस १ कोटी ५० लाख. * क वर्ग नगरपलिकेस १ कोटी रुपये. हागणदारीमुक्त नगरपरिषदा चिखलदरा, मुरुड-जंजिरा, पेण, कर्जत, राजापूर, मालवण, काटोल, मोहपा, रामटेक, उमरेड, महादुला, मुरगुड, गडिहग्लज, कुरुंदवाड, कागल, वडगाव, जयसिंगपूर, सासवड, इंदापूर, जेजुरी, शिरूर, तळेगाव, रहिमतपूर, दुधणी, मंगळवेढा, अक्कलकोट, मदर्गी, सांगोला, शिरपूर-वरवडे, फैजपूर, ित्रबक, शिर्डी. हागणदारीमुक्त महानगरपालिका : कोल्हापूर संपूर्ण स्वच्छ शहरे : पांचगणी, वेंगुर्ला व देवळाली प्रवरा.