मुंबई गोवा महामार्गावर अंजनारी घाटात खासगी बसचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. आज पहाटे लांज्याजवळील अंजनारी घाटात चालकाचा ताबा सुटल्याने बस १०० फूट दरीत कोसळली असून या अपघातात २ जण ठार झालेत. तर १९ जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी लांज्या येथील ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

विशाल ट्रॅव्हल्सची एक बस मुंबईवरुन कुणकेश्वर देवगडच्या दिशेने निघाली होती. पहाटे अंजनारी घाटात बसचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि बस दरीत कोसळली. या अपघातानंतर मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. २ ते ३ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

गणेशोत्सवानिमित्त चाकरमान्यांनी कोकणची वाट धरली आहे. सलग तीन दिवस सुट्ट्या आल्याने गर्दीही वाढली आहे.  यातच पहाटे अंजनारी घाटात अपघात झाल्याने वाहतूक कोंडीत भर पडली आहे.