मुंबई-नाशिक महामार्गासह जळगाव, औरंगाबाद येथे दरोडे टाकणाऱ्या दोन टोळ्यांना ठाणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. या टोळ्यांकडून पोलिसांनी १० लाखांचा ऐवज जप्त केला आहे.
नाशिक महामार्गावर लुटमारीच्या घटना वाढल्याने किन्हवली पोलीस ठाण्याचे निरीक्षक किशोर खैरनार पथकासह रात्रीची गस्त घालत असताना त्यांना शहापूरजवळ एक संशयित टेम्पो आढळून आला. त्यामधील मजूर पिंजारी, राजू शेख, मोसीस जाकीर या प्रवाशांची चौकशी केली असता ते चोरीच्या गुन्ह्य़ातील आरोपी असल्याचे आढळले. ते सर्व नाशिकजवळील पिळगाव येथील रहिवासी आहेत.
दुसऱ्या घटनेत कसारा भागात पोलिसांनी खुर्शीद शेख, रोशन शहा, हाहजफ पिंजारी, इब्राहिम पिंजारी, शरीफ शेख यांना ताब्यात घेतले. या टोळीने जळगाव, औरंगाबाद येथे दरोडे टाकल्याची कबुली दिली .