विरार येथील सकवार भागातील वागड गुरुकुल इंटरनॅशनल या निवासी शाळेतील तीन विद्यार्थाच्या मृत्यूप्रकरणी दोन शिक्षकांना विरार पोलिसांनी गुरुवारी अटक केली आहे. रिपू सुदन गर्ग आणि संदीप पालवा ही या शिक्षकांची नावे आहेत.
वागड गुरुकुल इंटरनॅशनल या निवासी शाळेतून बेपत्ता झालेल्या मित छाडवा, कुशल दागा आणि प्रफुल्ल पटेल या तिघा विद्यार्थ्यांचे मृतदेह शाळेच्या मागील ओहोळामध्ये बुधवारी आढळले होते. परीक्षेत कमी गुण मिळाल्याने या तिघांना शिक्षकांनी मारहाण केली होती. तसेच शिक्षक आणखी शिक्षा करतील, अशी भीती या विद्यार्थ्यांना वाटत होती. त्यामुळे हे तिघे सोमवारी शाळेतून पळून गेले आणि त्या धडपडीतच शाळेमागील ओहोळामध्ये पडून या तिघांचा मृत्यू झाल्याचा आरोप पालकांकडून करण्यात आला होता. दरम्यान, या घटनेप्रकरणी पालकांनी दिलेल्या तक्रारीवरून विरार पोलीस ठाण्यात या शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल झाला.