गणेशोत्सव हा हिंदूंचा सण असून तो भारतात साजरा करणार नाही तर मग काय पाकिस्तानमध्ये साजरा करणार का? असे म्हणत गणेशोत्सव दणक्यात साजरा व्हायला हवा असे प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले आहे. मुंबईतले गणेशोत्सव मंडळं आणि महापालिकेच्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी गणेशोत्सव उत्साहातच साजरा होणार असल्याचे म्हटले.
रस्त्यावर बसून नमाज पढणा-यांविरोधात कोणीही कोर्टात गेले नाही, पण आपल्या उत्सवांविरोधात आपलीच लोकं कोर्टात जातात अशी खंत त्यांनी व्यक्त केली. गणेशोत्सव लोकमान्य टिळकांनी सुरु केलेला उत्सव आहे तो दाऊदचा उत्सव नाही की त्याला विरोध करायला हवा असा चिमटाही त्यांनी काढला. गणेश मंडळांवर आरोप करण्याआधी त्यांचे सामाजिक काम पाहाण्याचा सल्लाही उद्धव ठाकरेंनी दिला आहे. गणेश उत्सव दणक्यातच झाला पाहिजे आणि त्यासाठी शिवसेना मंडळांच्या पाठीशी असल्याचं उद्धव यांनी म्हटले.  दरम्यान, गणेश विसर्जनादरम्यान होणाऱ्या घाणेरड्या प्रथा बंद व्हायला पाहिजेत असेही म्हटले. यावेळी नालेसफाईवरुन काल टीका करणाऱ्या भाजपचाही उद्धव ठाकरेंनी समाचार घेतला. मुंबईत एका दिवसात ३०० मिलीमीटर पाऊस पडला तर मुंबई तुंबणार नाही का? आणि मुंबईच्या नालेसफाईवरुन चिंता व्यक्त करणा-यांनी तुंबलेल्या दिल्लीकडे लक्ष द्यावे, तिथे सत्ता कोणाची आहे असा टोलाही त्यांनी भाजपाला लगावला आहे.