महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी यंदा मुंबईत कुठेच पाणी तुंबलं नसल्याचा अजब दावा केल्यानंतर आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पाणी कमी तुंबलं असं म्हटलं आहे. तसंच भूभाग समुद्रसपाटीपासून खाली असल्यामुळे काही वेळ पाणी साचत असल्याचंही उद्धव ठाकरे बोलले आहेत. पावसाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी महापालिकेच्या मुख्यालयात जाऊन आपत्कालीन विभागासोबत चर्चा केली.

मुंबईत रात्रीपासून सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे सकाळी अनेक ठिकाणी पाणी साचले होते. अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं असताना विश्वानाथ महाडेश्वर यांनी मात्र मुंबईत कुठेच पाणी साचले नाही असा दावा केला होता. मुंबईची तुंबई झाली असतानाही त्यांनी मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना चांगले काम केल्याचे प्रशस्तीपत्रकच दिले आहे.

‘मुंबईत कुठेही पाणी तुंबल नाही. काही दुर्घटना घडल्या पण त्यामध्ये जिवीतहानी झाली नाही हे सुदैव’, असे महाडेश्वर म्हणाले. ‘मी सकाळापासून मुंबईत फिरतोय पण मला कुठेही पाणी तुंबलेले दिसले नाही. काही ठिकाणी पाणी थोडंसं साचलं होतं पण ते काढून टाकण्यात आलं’, असंही ते म्हणाले. महापालिकेते अधिकारी, कर्मचारी, नगरसेवक परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत असे त्यांनी सांगितले.