बारामती : कृषिप्रधान देशातील शेतकऱ्यांनी आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा वापर करून शेती उत्पादन वाढवावे, असे मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी व्यक्त केले. दर्जेदार शेती उत्पादनातूनच चांगल्या प्रतीच्या अन्नधान्याची निर्मिती होऊ शकते, असे ते म्हणाले.

अ‍ॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट आणि कृषी विकास केंद्र बारामती यांच्यातर्फे माळेगाव येथे भरविण्यात आलेल्या ‘कृषिक २०२०’ या प्रदर्शनाचे उद्घाटन ठाकरे यांच्या हस्ते झाले. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, कृषिमंत्री दादा भुसे, प्रसिद्ध अभिनेते आमीर खान पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसायमंत्री सुनील केदार आणि बारामती कृषी विकास प्रतिष्ठानचे राजेंद्र पवार या वेळी उपस्थित होते.

ठाकरे म्हणाले,की मुंबई आणि इतर ठिकाणची अनेक कृषी प्रदर्शने मी पाहिली. पण, बारामतीचे हे कृषी प्रदर्शन पाहून मला समाधान वाटले. मी जर बारामतीला आलो नसतो तर चांगल्या कृषी प्रदर्शनाला मुकलो असतो. कुणालाही पाहून अभिमान वाटावे असेच हे कृषी प्रदर्शन आहे. नवीन शेती तंत्रज्ञान कार्य पद्धतीचा वापर करून शेती उत्पादन वाढीचे महत्त्व पटवून देण्यासाठी पवार कुटुंबीयांनी उत्तम कार्य केले आहे