अडथळा ठरणाऱ्या बांधकामांवर कारवाई पश्चिम उपनगरातील वाहतुकीला गती देण्याच्या उद्देशाने प्रस्तावित असलेला आणि तब्बल आठ ते दहा वर्षे रखडलेल्या जुहू-वर्सोवा जोडमार्गात अडथळा ठरणाऱ्या अनधिकृत बांधकामांवर पालिकेने बुलडोझर फिरविण्यास सुरुवात केल्याने या मार्गाला गती मिळण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. त्यामुळे लोखंडवाला संकुल, ओशिवरा लिंक रोड आणि आसपासच्या रहिवाशांची द्राविडी प्राणायामातून सुटका होणार आहे. त्याचबरोबर या परिसरातून जात असलेल्या मेट्रोच्या कामालाही गती मिळण्याची चिन्हे आहेत. प्रस्तावित मार्गाच्या उभारणीनंतर १० मिनिटांमध्ये अंधेरी पश्चिमेस पोहोचणे शक्य होईल. पश्चिम उपनगरातील वाहतुकीला गती मिळावी या उद्देशाने आठ ते दहा वर्षांपूर्वी एस. व्ही. रोड ते लिंक रोड दरम्यान जुहू-वर्सोवा जोडमार्ग उभारण्याचा निर्णय पालिकेने घेतला होता. मात्र, या प्रस्तावित मार्गादरम्यान खान कम्पाऊंड, कुरेशी कम्पाऊंड आणि अन्य काही ठिकाणी अनेक अतिक्रमणे झाली आहेत. ही अतिक्रमणे हटवणे शक्य न झाल्याने हा मार्ग रखडला होता मात्र, आता पालिकेने या मार्गाच्या बांधणीसाठी ठोस पावले उचलली आहेत. काही दिवसांपूर्वी पालिकेने खान कम्पाऊंड, कुरेशी कम्पाऊंड परिसरातील तब्बल १३५ अतिक्रमणे हटवून सुमारे ५० ते ६० चौरस फुटांचा भूखंड मोकळा केला. त्यामुळे आता खान कम्पाऊंड आणि कुरेशी कम्पाऊंड परिसरातून जाणाऱ्या जुहू - वर्सोवा जोडमार्गाच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. या पुढील परिसरात अतिक्रमण करून उभारलेल्या आणखी ३०० झोपडय़ा आहेत. या झोपडय़ा ‘झोपु’ योजनेमध्ये आहेत. त्यामुळे ‘झोपु’ योजनेअंतर्गत या झोपडपट्टीवासीयांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. हे झोपडपट्टीवासीयांचे जानेवारीमध्ये स्थलांतर झाल्यानंतर जोडमार्गाच्या कामाला गती मिळू शकेल, असा आशावाद पालिका अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. फायदा काय? सध्या अंधेरी पश्चिमेला जाण्यासाठी सी. डी. बर्फीवाला उड्डाणपूल ओलांडण्याचा पाऊण तासांचा द्राविडी प्राणायाम करावा लागतो. मात्र प्रस्तावित जुहू-वर्सोवा जोडमार्गाच्या उभारणीनंतर १० मिनिटांमध्ये अंधेरी पश्चिमेला पोहोचणे शक्य होणार आहे. जुहू-वर्सोवा लिंक मार्गामुळे लोखंडवाला संकुल, ओशिवरा लिंक रोड आणि आसपासच्या रहिवाशांना दिलासा मिळणार आहे. तसेच पूर्व द्रुतगती महामार्गावरून पश्चिम द्रुतगती महामार्गावर जाण्यासाठी जुहू-वर्सोवा जोडमार्ग दुवा ठरेल. मेट्रोलाही फायदा भविष्यात याच परिसरातून मेट्रो रेल्वे धावणार आहे. ही अतिक्रमणे मेट्रोच्या कामातही मोठा अडतळा बनली होती. मात्र जुहू-वर्सोवा जोडमार्गाच्या निमित्ताने पालिकेने अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली आहे. त्याचा फायदा मेट्रोलाही होणार असून ही अतिक्रमणे दूर झाल्यानंतर या भागातून जाणाऱ्या मेट्रोच्या कामालाही गती मिळू शकणार आहे. या मार्गाच्या उभारणीत अडथळा बनलेली अतिक्रमणे हटविण्याची मोहीम पालिकेने हाती घेतली आहे. जानेवारीमध्ये अतिक्रमणांचा अडथळू दूर होईल आणि फेब्रुवारीमध्ये जुहू-वर्सोवा जोडमार्गाच्या कामाला जलदगतीने सुरुवात होईल. साधारण वर्षभरात या मार्गाची उभारणी होईल आणि रहिवाशांना मोठा दिलासा मिळू शकेल. - प्रशांत गायकवाड, साहाय्यक आयुक्त, के-पश्चिम