मुंबईतील भांडुप येथे महाविद्यालयाबाहेर विद्यार्थ्याची हत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली. सुशील वर्मा (वय १७) असे या विद्यार्थ्याचे नाव असून रामकली महाविद्यालयाबाहेर ही घटना घडली. हत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नसून दिवसाढवळ्या ही घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

गुरुवारी सकाळी रामकली महाविद्यालयाबाहेर सुशील वर्मा या विद्यार्थ्यावर अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला. तोंडावर रुमाल बांधून आलेल्या हल्लेखोरांनी तीक्ष्ण हत्यारांनी सुशीलवर वार केले. यात सुशीलचा घटनास्थळीच मृत्यू झाला. सुशीलचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून त्याची हत्या का करण्यात आली, हे अद्याप समजू शकलेले नाही.

सकाळी दहा ते अकराच्या सुमारास सुशीलला दोन जणांनी फोन करुन महाविद्यालयाच्या बाहेर बोलावले होते. त्या फोन नंतर सुशील गेटबाहेर आला असता त्याच्यावर हल्ला करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी दोन तरुणांना ताब्यात घेतले आहे.