हिवाळा संपताना आणि उन्हाळ्याची सुरुवात होत असताना उत्तर भारत, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात अवकाळी पाऊस ‘हमखास’ येतो. त्याचे प्रमाण नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या तुलनेत अत्यल्प असते आणि त्यामुळे होणारे नुकसान जास्त. त्यामुळे या पावसाला नाके मुरडली जातात. पण तरीही निसर्गाचे हे चक्र आणि या पावसाची जन्मकथा मात्र मोठी रोचक आहे. माणसाची बुद्धी आणि मन मोठे अजब आहे. आता दरवर्षी नैऋत्य मोसमी पाऊस साधारण जूनमध्ये येतो आणि सप्टेंबरमध्ये जातो. पावसाच्या वर्षांनुवर्षांच्या वेळा लक्षात घेऊन मग केरळमध्ये सरासरी १ तारखेला पाऊस येतो आणि ७ जूनला मुंबईत दाखल होतो असे समजले. या तारखा ठरल्यावर मात्र पावसाने याच तारखांना प्रवेश केला पाहिजे, असे काही तरी आपल्याला वाटू लागते. १ जूनच्या आधी आलेला पाऊस म्हणजे वेळेआधीचा आणि एक जूननंतर पाऊस आला की तो लांबला असे जाहीर करतो. हल्ली निसर्गाचे काही खरे नाही, असेही बोलून मोकळे होतो. खरे तर निसर्गाचे काहीएक चक्र असते आणि ते त्याच्या पद्धतीने फिरत असते. आपण हे चक्र आपल्या तारखेबरहुकूम आणि घडय़ाळानुसार बसवण्याचा प्रयत्न करतो. त्यात चुकीचेही काही नाही. पण मग प्रत्येक वर्षी त्या दिवशी व त्या वेळी गेल्या वेळी प्रमाणेच निसर्गाने वागावे असे ठरवतो. तसे न झाल्यास निसर्गाचे काही तरी चुकतेय असेही म्हणतो. खरे तर निसर्ग बरोबर असतो. त्याच्या आणि मानवनिर्मित कॅलेंडरच्या तारखा जुळत नाहीत, एवढेच! अवकाळी पावसाचेही तसेच. अवकाळी म्हणजे काळ वेळ न बघता आलेला. आता पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात पडतोय त्या गारांच्या पावसाला अवकाळी पाऊस म्हटले जाते. आता ही काळ-वेळ माणसांच्या दृष्टीने. जून ते सप्टेंबरमधला पाऊस शेतीसाठी चांगला आणि इतर वेळचा पाऊस शेतीसाठी मारक म्हणून अवेळी आलेला. त्यातच हा पाऊस म्हणते नुसते पाणी नव्हे तर गारांचा मारा. त्यामुळे हा पाऊस पडला की जून महिन्यात छापली जातात तशी पावसात नाचणाऱ्या मुलांऐवजी जमिनीवर पडलेल्या शेतीची आणि मोठमोठय़ा गारांची छायाचित्रे प्रसिद्ध होतात. पण हा पाऊस काही अवेळीचा नाही. दरवर्षी या सुमारास तो येतो. त्याचे प्रमाण कमी जास्त असते मात्र हिवाळा संपताना आणि उन्हाळ्याची सुरुवात होत असताना या प्रकारचा पाऊस उत्तर भारत, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात हमखास येतो. त्याचे प्रमाण नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या तुलनेत अत्यल्प असते आणि त्यामुळे होणारे नुकसान जास्त. त्यामुळे या पावसाला नाके मुरडली जातात. पण तरीही निसर्गाचे हे चक्र आणि या पावसाची जन्मकथा मात्र मोठी रोचक आहे. गारा म्हणजे बर्फच. पण हिवाळ्यात काश्मीरमध्ये होणारी हिमवृष्टी आणि गारांचा पाऊस यात फरक आहे. साधारण डिसेंबर-जानेवारीत अफगाणिस्तानच्या दिशेकडून काश्मीरमध्ये थंडगार वारे येण्यास सुरुवात होते. या वाऱ्यांसोबत बाष्पही असते. या थंड वातावरणात खालच्या थरातील ढगांचे तापमान कमी होते व पाणी गोठण्यास सुरुवात होते. या प्रक्रियेतून तयार झालेले बर्फाचे षटकोनी आकाराचे स्फटिक जमिनीवर येतात. हे स्फटिक तयार होण्यासाठी वातावरणात ऊर्जा सोडली जाते व त्यामुळे हिमवर्षांव झाला की त्या भागातील तापमान एक ते दोन अंश सें.ने वाढते. गारांचा पाऊस पडताना मात्र याच्या उलट प्रक्रिया होते. हिवाळा व उन्हाळ्याच्या स्थित्यंतरात गारांचे ढग तयार होतात. या वेळी अफगाणिस्तानच्या दिशेकडून येत असलेले थंड वारे पूर्ण बंद झालेले नसतात, त्याच वेळी बंगालच्या उपसागरातून तसेच अरबी समुद्रातून भरपूर बाष्प घेऊन येणारे वारे दोन्ही बाजूंनी मुसंडी मारत असतात. भारताच्या मध्यावर मध्य प्रदेश, महाराष्ट्र येथे कमी दाबाचा प्रदेश असल्याने हे सर्व वारे या ठिकाणी एकत्र येतात. या वेगवान वारे सोबतचे बाष्प वेगाने वातावरणाच्या वरच्या थरात ढकलायला सुरुवात करतात. त्यातून मोठय़ा आकाराचे ढग तयार होतात. त्यांना म्हणतात क्युम्युलोनिंबस. क्युम्युलो म्हणजे पुंजके आणि निंबस म्हणजे पाऊस देणारे काळे ढग. आकाशात वरच्या थरात या काळ्या ढगांचे उंचच उंच आकाराचे पुंजके तयार होतात. मध्य प्रदेश किंवा महाराष्ट्रात खाली जमीन तापलेली असली तरी वातावरणाच्या वरच्या थरात तापमान अतिशय थंड असते. वारे हे ढग वेगाने वरच्या अतिथंड वातावरणात लोटत असल्याने या ढगातील पाण्यातून स्फटिक होण्याची प्रक्रिया सुरू होण्याआधीच ते गोठते. ढगातील बाष्पाचे थेट बर्फाच्या महाप्रचंड लादीत रूपांतर होऊ लागते, त्याचे वजन वाढते आणि मग एका क्षणी हा ढग वेगाने खाली येऊ लागतो. वातावरणातील खालच्या थरातील तापमानातील बदलामुळे जोरदार घर्षण होते आणि हा ढग फुटतो. त्या वेळी विजा कडाडतात, प्रचंड आवाज येतो आणि या ढगाचे तुटलेले तुकडे जमिनीवर विखुरतात. याच त्या गारा. गारा कोणत्याही आकाराच्या असतात. अगदी पिटुकल्या शेंगदाण्यापासून ते दोन्ही हातांना पेलवणार नाही अशा बर्फाच्या लादीएवढय़ाही. हा ढग फुटण्याचा व गारा पडण्याचा कार्यक्रम अगदी दहा ते पंधरा मिनिटांमध्ये उरकतो. गारा खाली येताना हवेतील तापमानामुळे त्या वितळायला सुरुवात होते. त्यासाठी हवेतील ऊर्जा वापरली गेल्याने साहजिकच परिसरातील तापमान कमी होते. यावर्षी फेब्रुवारी मार्चमध्ये गारांचा पाऊस पडला नाही. मात्र एप्रिल महिन्याच्या अखेरच्या आठवडय़ात या गारांचा तडाखा बसलाच. २०१४ आणि २०१५ मध्ये फेब्रुवारीपासून एप्रिलपर्यंत गारांनी शेतकऱ्यांना हैराण केले होते. लांबलेली थंडी आणि मध्य प्रदेश व महाराष्ट्रातील मध्यवर्ती भागातील कमी दाबाचा पट्टा अधिक तीव्र झाल्याने गारपिटीचा काळ लांबला होता. गारांचा पाऊस व जूनमध्ये येणारा नैऋत्य मोसमी पाऊस यांच्यामध्येही काही वेळा संबंध जोडला जातो. ज्या वर्षी गारांचा पाऊस जास्त पडतो व लांबतो त्या वेळी मोसमी पाऊस कमी पडतो असे म्हटले जाते. २०१४ आणि २०१५ या दोन्ही वर्षी त्याचा अनुभव आला. त्यामानाने गेल्या वर्षी गारांनी कमी तडाखा दिला आणि पावसाने राज्याला हात दिला. या वर्षी एप्रिलच्या अखेरच्या आठवडय़ात गारांचा पाऊस पडला. मे महिन्यात आणखी काही वेळा गारांचा पाऊस पडला तर तो मोसमी वारे लांबणार असल्याचा संकेत ठरू शकतो. prajakta.kasale@expressindia.com