टोल ठेकेदार – अधिकाऱ्यांच्या भ्रष्ट युतीला झटका; मोजणीची प्रचलित पद्धत बंद

अधिकारी आणि ठेकेदारांच्या संगनमताने रस्त्यांवरील वाहनांची संख्या फुगविण्याच्या किंवा कमी दाखविण्याच्या गैरप्रकारांना आळा घालण्याकरिता यापुढे रस्त्यांवरील वाहनांची मोजणी करण्याकरिता अत्याधुनिक यंत्रणेचा वापर करण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतला आहे. टोल रद्द करण्यात आलेल्या किंवा बंद करण्याची योजना असलेल्या रस्त्यांवर नेमकी वाहनांची संख्या किती याची अचूक आकडेवारी कॅमेऱ्याच्या माध्यमातून मोजणी केल्याने येऊ शकेल.

खासगीकरणातून रस्ते तयार करताना टोल आकारणीकरिता त्या रस्त्यावरून नेमकी किती वाहने ये-जा करतात याची बांधकाम विभागाकडून मोजणी केली जाते. ही मोजणी रस्त्याच्या कडेला टेबल आणि खुर्ची टाकून बांधकाम खात्याने नेमलेल्या ठेकेदाराकडून वा बांधकाम खात्याच्या कर्मचाऱ्यांकडून केली जाते. टोल वसुलीचा कालावधी जास्त मिळावा म्हणून वर्दळ असलेल्या रस्त्यांवर वाहनांची संख्या कमी दाखविली जाते. वाहनांची संख्या कमी असल्याने ठेकेदाराला वसुलीसाठी जास्त कालमर्यादा मिळते. याशिवाय एखाद्या रस्त्याचे खासगीकरण करण्याकरिता प्रत्यक्षात कमी संख्या असली तरी वाहनांची संख्या फुगविली जाते. वर्षांनुवर्षे चालणाऱ्या या गैरप्रकारांना आळा घालण्याकरिताच बांधकाम विभागाने प्रचलित पद्धत रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्यातील ४० पेक्षा जास्त रस्त्यांवरील टोल बंद करण्यात आले किंवा छोटय़ा वाहनांना सवलत देण्यात आली. या टोल ठेकेदारांना राज्य शासनाला नुकसानभरपाई द्यायची आहे. काही मार्गावर प्रत्यक्षात वाहनांची संख्या जास्त असताना कमी वाहने दाखविण्यात आली आहेत. यामुळे ठेकेदारांचा फायदा होऊ शकतो. याला आळा घालण्याकरिताच अत्याधुनिक पद्धतीने टोल नाक्यांवर वाहनांची मोजणी सुरू करण्यात येणार आहे. काही ठेकेदार सरकारच्या विरोधात न्यायालयात गेले आहेत, तेथे पुरावा म्हणून या यंत्रणेच्या माध्यमातून मोजणी झालेली आकडेवारी सादर केली जाणार आहे.

* वाहनांची प्रत्यक्ष संख्या किती याची मोजणी करण्याकरिता ‘एटीसीसी’ (अ‍ॅटोमेटिक ट्रॅफिक क्लासिफिकेशन अ‍ॅण्ड काऊंटिंग) ही यंत्रणा आता वापरण्यात येणार आहे. एखाद्या रस्त्यावरून किती वाहने ये-जा करतात हे कॅमेऱ्याच्या माध्यमातून टिपले जाणार आहे.

*  कॅमेऱ्याचा वापर केल्याने वाहनांच्या संख्येचा अचूक अंदाज येईल, असे सार्वजनिक बांधकाम खात्याचे सचिव आशीषकुमार सिंग यांनी सांगितले. राज्यातील रस्त्यांवर नक्की वाहतूक होते याचीही आकडेवारी अचूकपणे समजू शकेल.