‘मिस्टिक मॅस्यूर’ ही व्ही. एस. नायपॉल यांची पहिली प्रकाशित कादंबरी. तिच्यावर २००१ साली चित्रपटही निघाला.

सामाजिक भाष्य करणाऱ्या या कथानकातून घडत्या इतिहासाची चाहूलच कशी लागली होती, याविषयीचे हे टिपण..

Biopic ‘Amar Singh Chamkila’ released
अमर सिंग चमकीला यांचा चरित्रपट प्रदर्शित; २७ व्या वर्षी हत्या झालेले ‘एल्विस ऑफ पंजाब’ नेमके कोण?
Bijay Anand on Maidaan vs Bade Miyan Chote Miyan clash
सोनाली खरे तिची लेक अन् पती, तिघांचे दोन सिनेमे एकापाठोपाठ प्रेक्षकांच्या भेटीला; बिजय त्यांच्या चित्रपटाबद्दल म्हणाले…
Percival Everett is an American writer American fiction cinema Oscar
बुकबातमी: भटकबहाद्दराची मिसिसिपी मुशाफिरीच, पण भिन्न नजरेतून..
Loksatta kutuhal Use of artificial intelligence in film
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेची चित्रपटातील बीजे

भारतात प्रदीर्घ नावांच्या लग्नपट-प्रेमपटांचे वादळ शमल्यानंतर क्रॉस-ओव्हर सिनेमांची मोठी लाट आली होती. त्यादरम्यान व्ही. एस. नायपॉल यांच्या ‘मिस्टिक मॅस्यूर’ या कादंबरीवर चित्रपट दाखल झाला होता. म्हणजे कादंबरी वेस्ट इंडिजमध्ये प्रकाशित झाल्यानंतर सहा दशकांनंतर मर्चण्ट आयव्हरी फॅक्टरीतून तयार झालेल्या चित्रपटामुळे जगाला त्रिनिनादमधील भारतीय वंशाच्या समाजाने वसविलेला समांतर भारत उलगडला. २००१-२००२ सालापर्यंत नायपॉल यांच्या भारतावरील टीकेचा आणि त्यावरून झालेल्या वादंगाचा धुरळा कायम होता. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर लगेचच तो छोटय़ा पडद्यावर वारंवार दाखविला जात होता. स्वातंत्र्योत्तर भारताचे आणि इथल्या राजकीय-सामाजिक जाणिवांचे प्रारूप वेस्ट इंडिज बेटांवर अल्पसंख्य हिंदू समुदायाने कसे राबविले, याचे नायपॉलकृत चित्र सिनेमामध्ये साकारण्यात आले होते.

ऑक्सफोर्डमधून शिकून यातला नायक गणेश त्रिनिनादमधील आपल्या गावी येतो, ते पुस्तक लिहिण्याची महत्त्वाकांक्षा घेऊन. या पुस्तकी किडय़ाची सरबराई आणि त्याच्या विक्षिप्त संकल्पनांना खतपाणी घालणारी तऱ्हेवाईक माणसांची फौजच सिनेमात दिसते. सल्लागार मित्र, पापभीरू पत्नी आणि तऱ्हेवाईक सासरा यांच्यासमवेत स्वत:चे छायाचित्र मुखपृष्ठावर छापून त्याचे पुस्तक प्रकाशित होते. त्या पुस्तकाच्या अर्पणपत्रिकेवरूनही कौटुंबिक हेवेदाव्याचा प्रसंग निर्माण होतो. साहित्यवर्तुळात पूर्णपणे रद्दी ठरलेल्या त्या पुस्तकाच्या प्रकाशनानंतर मात्र या नायकाचे कार्यक्षेत्र विस्तारते, ते लेखनबाह्य़ उपक्रमांचा आधार घेण्यातून. स्वयंघोषित गुरू-महाराज बनून तो लोकांच्या समस्यांवर रामबाण उतारा देण्याचे काम करतो. त्याच्या मसाजी उताऱ्यांनी अनवधानाने बरे झालेले लोक त्याच्या गुणांचा प्रचार करतात आणि काही कालावधीतच तो वेस्ट इंडिजमधील भारतीय समुदायाचा उत्तम प्रतिनिधी म्हणून नावारूपाला येतो. राजकारणामध्ये शिरल्यानंतर त्याच्या शोकांतिकेचा आरंभ होतो.

नायपॉल यांच्या या पहिल्या कादंबरीमध्ये त्रिनिनादमध्ये वसलेले भारतीयत्व चित्रित झाले होते. वेस्ट इंडिज बेटावर ब्रिटिशांनी स्थलांतरित केलेल्या भारतीय नागरिकांच्या वसाहतीने आपला देश सोडला, मात्र आपली संस्कृती, देव, प्रथा, परंपरांना तिलांजली दिली नाही. त्यांनी त्रिनिनाद बेटावर आपला देश तयार केला. खान-पान व्यवहारांपासून प्रवृत्तीनेही भारतीय राहिलेल्या या माणसांवर भारतीय स्वातंत्र्यलढय़ापासून ते भारतात घडणाऱ्या घटनांचे पडसाद उमटत होते.

भारतातील राजेशाही, महाराजा यांचे आकर्षण तेथील सामान्य लोकांनाही होते. ‘मिस्टिक मॅस्यूर’मध्ये त्याचे किती तरी संदर्भ येतात. यातील नायक उंची पोशाखात दाखल होतो, तेव्हा त्याच्या पत्नीचा ‘एकदम महाराजा वाटतोस’ ही प्रतिक्रियाच मोठी गंमतशीर आहे. हा अतिमहत्त्वाकांक्षी नायक राजकारणात प्रवेश करतो, तेव्हा भारतीय स्वातंत्र्यलढय़ाचे दाखले देतो. गांधीगिरीचे प्रयोग त्रिनिनादमधील भारतीयांना एकत्र करण्यासाठी वापरतो. या सगळ्या अस्त्रांनी लवकरच त्याची रवानगी राजकारणातल्या उच्चस्थानावर होते आणि एका साधारण माणसाची राष्ट्राच्या महत्त्वाच्या व्यक्तीपदी वर्णी लागते.

‘मालगुडी डेज’ छापाच्या चित्रीकरणासारखा हा चित्रपट जराही भारताविषयी नसला, तरी साऱ्याच भारतीय कलाकार चेहऱ्यांमुळे आणि कथाप्रवासातील खाचखळग्यांमुळे तो पूर्णत: आपला वाटतो, ही या चित्रपटाची आणखी एक गंमत आहे.

त्रिनिनादमधील बुवाबाजी, लग्नसोहळे, आर्थिक दुर्बल घटकांचे रोजचे जगणे यामध्ये सूक्ष्मपणे दाखविण्यात आले आहे; पण सगळ्यात तिरकस आहे, ती इथल्या लेखकाची पुस्तक लिहिण्याची इच्छा, पुस्तक लिहून जगावर उपकार करीत असल्याचा आविर्भाव आणि आपली पुस्तकेच आपले अपत्य असल्याची पत्नीचे सांत्वन करताना दिलेली कबुली.

पुढे नायपॉल यांचा मुस्लीमव्देष उत्तरोत्तर त्यांच्या लिखाणात आणि विचारांतून प्रगट झाला असला, तरी त्रिनिनादमध्ये विकसित झालेल्या हिंदूप्रेम आणि हिंदू जाणिवांचा उत्कर्षबिंदू या कादंबरीमध्ये आणि त्यावर आधारलेल्या चित्रपटामध्ये अचूकरीत्या टिपला आहे. धर्माच्या आधारावर राजकारणाचे पीक उत्तम येते, याचे नमुनेदार चित्रण या सिनेमामध्ये आले आहे. त्या वर्षी बहुतांश जागतिक समीक्षकांनी या चित्रपटाला गौरविलेला असला, तरीही मर्यादित प्रेक्षकांपर्यंतच तो पोहोचला आहे. नायपॉल यांच्या मृत्यूच्या निमित्तानेच नाही तर सध्या जगात धर्माच्या नावे सुरू असलेल्या राजकीय प्रयोगांच्या निमित्ताने या चित्रपटाची आडवाट चोखाळणे आवश्यक बनले आहे.