डाळ महागल्याने नामांकित साखळी विक्रेत्यांकडून दरांत वाढ गरिबांची पोटपूजा, मध्यमवर्गीयांचे फावल्या वेळेतील उदरभरण आणि श्रीमंतांसाठी चवीचे खाणे असलेला वडापाव आता चक्क २० रुपयांवर पोहोचला आहे. चणाडाळीच्या दरांत झालेल्या वाढीमुळे डाळीचे पीठ महागले असून त्याचा परिणाम वडापावच्या किमतीवरही झाल्याचे दिसून येत आहे. मुंबईतील नामांकित खाद्यविक्रेत्यांच्या साखळी दुकानांतील वडापावचे दर पाच ते सात रुपयांनी वाढवण्यात आले आहेत. तर गाडीवर मिळणाऱ्या वडापावचे दरही दोन ते तीन रुपयांनी वाढवण्यात आल्याचे चित्र आहे. गेल्या दोन महिन्यांत चण्याच्या डाळीच्या किमती वाढल्या असून ७० रुपये किलो मिळणारी डाळ आता १५० रुपये किलो अशी विकली जात आहे. दिवाळीतील फराळाला या दरांचा चांगलाच चटका बसला आहे. आता वडापावच्या दरांवरही डाळीच्या महागाईचे पडसाद दिसू लागले आहेत. चणाडाळीसोबत डाळीचे पीठही महागल्याने विक्रेत्यांनी वडापावच्या दरात वाढ करण्यास सुरुवात केली आहे. साध्या गाडीवर १२ रुपयांना मिळणारा वडापाव १५ रुपयांवर पोहोचला आहे. त्यासोबतच भजीच्या प्लेटचे दरही ४ ते ५ रुपयांनी वाढवण्यात आले आहेत. ‘गेल्या सहा महिन्यांपासून चण्याच्या पिठाच्या किमती वाढतच आहेत. त्यामुळे सध्याच्या दरांत वडापाव विकणे परवडेनासे झाले आहे. त्यामुळे आमच्याकडे वडापावचा दर १५ रुपयांवरून २० रुपये करण्यात आला आहे,’ असे सीएसटी स्थानकाजवळील नामांकित ‘आराम’ हॉटेलचे मालक कौस्तुभ तांबे यांनी सांगितले. दादर स्थानकाजवळील जम्बो किंग या वडापावच्या शाखेत १५ रुपयांचा भजीपाव १८ रुपयांनी विकला जात आहे. वडापावची कायम मागणी असते, मात्र डाळीच्या किमती वाढल्यामुळे व्यवसाय करणे परवडत नसल्याचे या दुकानाच्या व्यवस्थापकांनी सांगितले. हेच चित्र दादरच्या प्रसिद्ध श्रीकृष्ण या दुकानात दिसत आहे. काही दिवसांपूर्वी येथे ३० रुपयांना मिळणाऱ्या (दोन वडे) वडाप्लेटची किंमत वाढवून ३४ रुपये करण्यात आली आहे. भडकलेल्या डाळींमुळे वडापावच्या किमती वाढवल्या असल्याचे या दुकानाचे व्यवस्थापक अनंत यांनी सांगितले. वाढत्या महागाईचा परिणाम व्यवसायावर होत आहे. सध्या आमच्याकडे वडापाव २० रुपये आणि चुरापाव १५ रुपयांना विकला जात आहे. चण्याच्या पिठाच्या किमती वाढल्यामुळे आमचे नुकसान होत आहे, मात्र सध्या तरी वडापाव आणि चुरापावच्या किमतीत वाढ केली नाही, असे कीर्ती महाविद्यालयाजवळील कीर्ती वडापावचे मालक अशोक ठाकूर यांनी सांगितले.