ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे आज सकाळी वृद्धापकाळाने निधन झालं. ते ९५ वर्षांचे होते. महाराष्ट्रातल्या नावाजलेल्या आणि धडाडीच्या पत्रकारांमध्ये मुख्य क्रमाने त्यांचं नाव घेतलं जातं. दिनू रणदिवे यांचा जन्म १९२५ मध्ये झाला. १९५६ मध्ये त्यांनी पत्रकारिता करण्यास सुरुवात केली. दलित, उपेक्षित, वंचित यांचे प्रश्न त्यांनी कायमच मांडले. त्यांच्या समस्यांसाठी ते कायमच झगडत होते. आज अखेर वृ्द्धापकाळाने त्यांची प्राणज्योत मालवली. १९५५ मध्ये समाजवादी पक्षाने पुकारलेल्या गोवा मुक्तीसंग्रामात दिनू रणदिवे सक्रिय होते. तसंच संयुक्त महाराष्ट्र चळवळीतही त्यांचा सहभाग होता. या लढ्यात त्यांनी आचार्य अत्रे यांच्यासोबत तुरुंगवासही भोगला. संयुक्त महाराष्ट्र समितीने १९५६ मध्ये संयुक्त महाराष्ट्र पत्रिका या नावाचे अनियतकालिक सुरु केले. रणदिवे यांच्या पत्रकारितेची सुरुवात झाली ती इथूनच. त्यानंतर ते दीर्घकाळ महाराष्ट्र टाइम्समध्ये कार्यरत होते. १९८५ मध्ये ते महाराष्ट्र टाइम्समधून निवृत्त झाले. १९७२ मध्ये त्यांनी केलेलं बांगलादेश मुक्ती लढ्याचंही वार्तांकन गाजलं होतं . मुंबई प्रेस क्लबचा जीवन गौरव पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात आले होते. देवेंद्र फडणवीस यांनी वाहिली आदरांजली १६ मे रोजी त्यांच्या पत्नी सविताताई आपल्यातून निघून गेल्या आणि आज १६ जून रोजी ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे! संपूर्ण आयुष्य व्रतस्थ भावनेने पत्रकारिता करणारा, सामाजिक जाणिवा जागृत ठेवून समर्पित भावनेने काम करणाऱ्या एका ज्येष्ठ पत्रकाराला आपण आज मुकलो.त्यांनी आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून वंचित, उपेक्षित,गिरणी कामगार यांचे प्रश्न ऐरणीवर आणले. बांगलादेश युध्दाचे प्रत्यक्ष वार्तांकन केले. मुंबईतील दंगलीचे वार्तांकन करताना या दंगलीचे सामाजिक वास्तव त्यांनी समाजापुढे मांडले होते. माझी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. महिन्याभरापूर्वीच दिनू रणदिवे यांच्या पत्नीचे निधन झाले होते. आज त्यांचीही प्राणज्योत मालवली.