ज्येष्ठ अभिनेत्री विमल घैसास यांचे वृद्धापकाळाने नुकतेच मुंबईत निधन झाले. त्या ९६ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात ज्येष्ठ जावई मधुसूदन जोशी, कनिष्ठ कन्या सुधा कानडे, पद्मश्री विजय कदम, अलंकार, पल्लवी जोशी-अग्निहोत्री, अभिजित कानडे, संपदा स्वप्निल बांदोडकर ही नातवंडे असा परिवार आहे. विमल घैसास यांनी ‘कुबेर’, ‘जरा जपून’, ‘कुंकवाचा धनी’, हिरवा चुडा’, ‘सप्तपदी’, ‘बाळा जो जो रे’, ‘श्यामची आई’, ‘बदला’ या मराठी तर ‘मोती’, ‘रुपयोंकी कहॉंनी’, ‘मै अबला नही हू’, ‘मजदूर’ या हिंदी तसेच ‘जोगीदास खुमांड’ या गुजराती चित्रपटात काम केले होते. घैसास यांनी ‘कुलवधू’, ‘संत तुकाराम’, ‘संशयकल्लोळ’, ‘खडाष्टक’, ‘शेजारीपाजारी’, ‘सावळागोंधळ’, ‘पठ्ठे बापूराव’ आणि ‘तो मी नव्हेच’ आदी नाटकांतून भूमिका केल्या होत्या. ‘संत तुकाराम’नाटकातील त्यांच्या भूमिकेचे कौतूक झाले. त्याची दखल घेऊन बालगंधर्वानी त्यांना गंधर्व कंपनीत बोलावून घेतले. तिथे त्यांनी अनेक नाटकांतून काम केले.