“महापौर विश्वनाथ महाडेश्वर सरांनी माझा हात पिरगळला नाही. त्यांनी माझा विनयभंग केलेलाच नाही. त्यामुळे त्यांच्याविरोधात पोलिसांकडे तक्रार करण्याचा प्रश्नच येत नाही. काही राजकीय पक्ष चुकीचा प्रचार करत आहेत,” अशा शब्दात सांताक्रूज आंदोलनातील ‘त्या’ महिलेने आपली भूमिका मांडली आहे. ‘महाडेश्वर यांनी एका महिलेचा विनयभंग केला, त्यांनी महिलेचा हात मुरगळला’ असा संदेश प्रसारित करणारा “व्हिडीओ व्हायरल करण्यामागे एका राजकीय पक्षाचे कार्यकर्ते असून त्यामागे विश्वनाथ महाडेश्वर सरांची बदनामी करणं हा त्यांचा हेतू आहे”, असंही मत या महिलेनं व्यक्त केलं आहे. हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. आता, मनसे व अन्य राजकीय पक्षांनी महाडेश्वर यांच्या राजीनाम्याची मागणी केली असताना, या व्हिडीओवर ते काय प्रतिक्रिया देतात हे बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

गेल्या आठवड्यात सांताक्रूज पटेलनगर येथे विजेच्या धक्क्याने माय-लेकाचा मृत्यू झाल्यानंतर नागरिकांनी रास्ता रोको केला होता. त्यावेळी “आम्ही हातांची साखळी करून महापौरांना रस्त्यात रोखले असता महाडेश्वर सरांनी फक्त माझा हात बाजूला केला, त्यांनी माझा हात पिरगळला नाही” असं ‘त्या’ महिलेने एका व्हिडिओद्वारे सांगितलं आहे.

“ह्या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे माझी आणि महाडेश्वर सरांची विनाकारण बदनामी होत आहे. प्रत्यक्षात माझा विनयभंग झालेलाच नाही. मी महाडेश्वर सरांच्या विरोधात पोलिसांकडे विनयभंगाची तक्रार दाखल करावी, यासाठी राजकीय पक्षांचे पदाधिकारी माझ्याकडे सतत आग्रह धरत आहेत. पण मला राजकारणात अजिबात रस नाही. मी कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाही”, असंही ‘या’ महिलेने व्हिडिओमध्ये स्पष्ट केलं आहे.

महापौरांनी महिलांना दमदाटी केली आणि त्यांचा विनयभंग केला असा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर काही पक्षांच्या महिला नेत्यांनी विश्वनाथ महाडेश्वर यांनी महापौर पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली होती. मनसेच्या नेत्या शालिनी ठाकरे यांनी महापौरांवर कारवाई करण्यात यावी अशी पोलिस उपायुक्तांकडे मागणी केली होती.

या आरोपांबाबत महाडेश्वर यांनी “मी गेली तीन दशकं वांद्रे-खार-सांताक्रूज परिसरात शिवसैनिक म्हणून काम करत आहे. प्रत्यक्ष शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी माझ्यावर राजकीय –सामाजिक संस्कार केले आहेत. मी माझ्या आजवरच्या संपूर्ण कारकीर्दीत कधीही महिलांचा अवमान केलेला नाही,” असे सांगितलं आहे. माझ्यावर ज्यांनी बिनबुडाचे आरोप केले, त्यांचा खोटेपणा सदर महिलेने स्वत:च उत्तर देऊन उघड केला आहे असंही ते म्हणाले आहेत.

“माझ्या बदनामीचा कट रचला गेल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे, युवा सेनाप्रमुख आदित्यजी ठाकरे तसंच शिवसेनेचे सर्व वरिष्ठ नेते आणि विभागातील शिवसैनिक तसंच नागरिक हे माझ्या पाठिशी ठामपणे उभे राहिले, त्या सर्वांविषयी मी कृतज्ञता व्यक्त करतो”, असेही महापौर महाडेश्वर म्हणाले आहेत.