१८ च्या मोच्र्यात शिवसेना-कम्युनिस्ट एकत्र, दोन दिवस औद्योगिक बंदएकेकाळी राजकीय अस्तित्वासाठी गिरणगावात ज्यांचा परस्परांशी घनघोर संघर्ष झाला आणि अजूनही तो कडवटपणा गेलेला नसताना केंद्र सरकारच्या कामगार, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या विरोधातील धोरणांच्या विरोधात लढण्यासाठी कम्युनिस्ट आणि शिवसेना यांची अभूतपूर्व अशी एकजूट झाली आहे. कामगारांच्या प्रश्नावर कम्युनिस्ट व शिवसेना यांच्यासह इतर पक्षांशी सलग्न कामगार संघटनांचा १८ मार्चला विराट मोर्चा आझाद मैदानावर धडकणार आहे. तर याच प्रश्नावर २० व २१ फेब्रुवारीला पुकारण्यात आलेल्या औद्योगिक बंदसाठीही सारे डावे-उजवे पक्ष व संघटना मैदानात उतरणार आहेत. केंद्रातील संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारची धोरणे सर्वसामान्य माणसाला जगणे मुश्किल करून सोडणारी आहेत. डिझेल, पेट्रोल, गॅसदरवाढ आणि सर्वच जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या महागाईचा कामगार, कष्टकरी व मध्यवर्गीयांना फटका बसत आहे. त्याचा निषेध म्हणून देशव्यापी आंदोलन करण्यासाठी आयटक या कम्युनिस्टप्रणित कामगार संघटनेने पुढाकार घेतला. केंद्र सरकारच्या कामगारविरोधी धोरणाच्या विरोधातील आंदोलनाची व्याप्ती व तीव्रता वाढविण्यासाठी आयटकने सर्वच पक्षांच्या कामगार संघटनांना आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले होते. त्याला डाव्या-उजव्या सर्वच पक्षांशी सलग्न कामगार संघटनांनी समर्थन देत थेट आंदोलनातही उतरण्याची तयारी केली आहे. मुंबईत, विशेषत: गिरणगावतच १९७० च्या दशकात कम्युनिस्ट व शिवसेना यांच्यात घनघोर संघर्ष झाला होता. शिवसेना व कम्युनिस्ट यांच्यातील वैचारिक मतभेदही टोकाचे आहेत. अशा परिस्थितीत आता केंद्र सरकारच्या विरोधातील आंदोलनात कम्युनिस्टप्रणिक आयटक, सिटू, शिवसेनेची भारतीय कामगार सेना, भाजपशी सलग्न भारतीय मजदूर संघ, काँग्रेसप्रणित इंटक अशा सर्वच डाव्या-उजव्या विचारांच्या संघटना एकत्र येणार आहेत. त्याचाच एक भाग म्हणून १८ फेब्रुवारीला भायखळा येथील जिजामाता उद्यानापासून ते आझाद मैदानापर्यंत कामगारांचा विराट मोर्चा काढण्यात येणार आहे. २० व २१ फेब्रुवारीचा औद्योगिक बंदही यशस्वी करण्याची पूर्ण तयारी केली आहे, असे भाकपचे नेते प्रकाश रेड्डी यांनी सांगितले.