मुंबईतील महाविद्यालयांमध्ये भगवदगीतेचं वाटप करण्यावरुन शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडेंवर टीका होऊ लागली आहे. दरम्यान विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना विनोद तावडे यांनी भगवदगीता वाईट आहे असं काँग्रेस, राष्ट्रवादी आणि समाजवाद्यांनी जाहीर करावं असं आव्हानच दिलं आहे. तसंच श्रीकृष्ण खोटं बोलत होते असं मत असल्याचंही त्यांनी स्पष्ट करावं असं विनोद तावडेंनी म्हटलं आहे.

मुंबईतील महाविद्यालयांमध्ये भगवदगीतेचं वाटप करण्याची सूचना देण्यात आली आहे. उच्च शिक्षण विभागाने यासंबंधी परिपत्रक जारी केलं आहे. फक्त अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमध्ये भगवतगीता वाटली जाणार आहे. दरम्यान या निर्णयामुळे नवा वाद निर्माण झाला असून विरोधकांनी टीकेला सुरुवात केली आहे.

परिपत्रकात सांगण्यात आल्यानुसार, नॅक मुल्यांकन झालेल्या अ/अ+ श्रेणी प्राप्त मुंबई आणि मुंबई उपनगरांमधील १०० महाविद्यालयांमध्ये भगवतगीतेचं वाटप केलं जाणार आहे. यासाठी प्राचार्यांना भगवतगीतेच्या १०० संचाचे वाटप करण्याचा आदेश देण्यात आला आहे.

निर्णयावर विरोधकांकडून टीका होऊ लागल्यानंतर विनोद तावडे यांनी यासंबंधी स्पष्टीकरण दिलं आहे. ‘सरकार भगवदगीतेचं वाटप करत नसून भिवंडीची भक्ती वेदांत संस्थेने ही मागणी केली होती. भगवदगीतेचं मोफत वाटप करण्याचा त्यांचा प्रस्ताव होता. उद्या कोणी कुराण आणि बायबलचं वाटप करण्याची मागणी केली तर तेदेखील करु’, असं विनोद तावडेंनी म्हटलं आहे.