मराठी राजभाषा दिन विशेष

नमिता धुरी

मराठीतून शिक्षण देणाऱ्या शाळांची घटलेली संख्या, व्यवहारात कमी झालेला राज्यभाषेचा वापर आणि विविध प्रकारच्या प्रशिक्षण वर्गामध्ये अडकलेले विद्यार्थी याचा परिणाम मुंबईसह राज्यातील मराठी ग्रंथालयांच्या बाल विभागावर झाला. बालवाचकांनी मराठी बालसाहित्याकडे पाठ फिरवल्याने सभासद टिकवण्यासाठी इंग्रजी साहित्याची पुस्तके वाढवण्याची वेळ सध्या ग्रंथालयांवर आली आहे.

मुलांनी ग्रंथालयांकडे वळावे यासाठी ‘माहीम सार्वजनिक वाचनालया’तर्फे परदेशी भाषा, नाटक, अक्षरकला (कॅलिग्राफी) इत्यादी शिबिरे उन्हाळ्याचा सुट्टीत घेतली जातात. यातून काही बाल सभासद वाचनालयाला मिळतात; मात्र त्यांचा कल प्रामुख्याने इंग्रजी पुस्तकांकडे असतो. या वाचनालयाच्या बाल विभागात तीन हजार मराठी, तर साडेतीन हजार इंग्रजी पुस्तके आहेत.

‘मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालया’त बाल विभागासाठी इंग्रजी पुस्तके नाहीत. १० शाखांमध्ये बाल विभाग आहे. प्रत्येक शाखेत ५०हून कमी बालवाचक आहेत. उन्हाळ्याच्या सुट्टीत ‘बालझुंबड’ कार्यक्रमांतर्गत मुलांना मोफत वाचन करता येते. त्यातून सभासद मिळतातच असे नाही. इंग्रजी माध्यमातील शिक्षण आणि विविध प्रकारच्या शिकवण्या किंवा प्रशिक्षणांमध्ये जाणाऱ्या मुलांचा वेळ हे बालवाचक कमी होण्यामागील कारण असल्याचे ग्रंथसंग्रहालयाचे अधीक्षक सुनील कुबल यांनी सांगितले.

गोरेगावच्या ‘प्रबोधनकार ठाकरे वाचनालया’त एक हजार मराठी पुस्तके आहेत. इंग्रजी पुस्तकांची संख्या मात्र साडेतीन हजारांच्या घरात पोहोचली आहे. ‘इंग्रजी माध्यमाच्या मुलांना मराठी शब्दांचे अर्थ कळत नाहीत. त्यामुळे मुलांना पुस्तके वाचून दाखवायला आम्ही पालकांना सांगतो; पण पालकांनाही वेळ नसतो’, असे वाचनालयाच्या ग्रंथपाल सुधा पाटील यांनी सांगितले. त्यांच्याकडील २०० पैकी चार-पाच सभासदच मराठी वाचणारे आहेत.

दादर सार्वजनिक वाचनालया’चीही (दासावा) काहीशी हीच स्थिती आहे. ‘सुट्टय़ांच्या काळात मुलांसाठी विविध स्पर्धा, मोफत वाचन असे उपक्रम राबवले जातात. त्याला हवा तसा प्रतिसाद मिळत नाही. सुट्टीत बाहेरगावी फिरायला जाण्याकडेच पालकांचा अधिक कल असतो. त्यामुळे बालवाचकांची संख्या कमी होत आहे’, दासावाचे कोषाध्यक्ष मनोहर साळवी यांनी सांगितले. बाल विभागाच्या १५ हजार पुस्तकांपैकी निम्म्याहून अधिक मराठी आहेत; पण इंग्रजी पुस्तकांचे प्रमाण वाढवावे लागत असल्याचेही त्यांनी सांगितले. राज्यभरातील मराठी ग्रंथालयांमध्ये कमी-अधिक प्रमाणात असेच चित्र आहे.

झाले काय?

नव्वदीच्या दशकापर्यंत प्रकाशित होणारे बालसाहित्य, मुलांना उपक्रमशील बनविणारी मासिके यांतून घराघरांत बाल-कुमार वाङ्मयाचा वाचक टिकून राहिला होता. या दशकात मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमातून शिकविण्याकडे कल वाढला. त्यामुळे बालसाहित्याचा नवा वाचकच तयार झाला नाही. वाचक नसल्याने बालसाहित्य देणारी अनेक नियतकालिके बंद पडली. नव्याने बालपुस्तके येण्याचे प्रमाण कमी झाले. वाचक नसल्याने बाल-कुमार वाङ्मय नाही, नवे बालसाहित्य नाही म्हणून वाचक नाही, असे दृष्टचक्र तयार झाले.

एखाद्या महापुरुषाच्या जयंतीनिमित्त शाळेत भाषण करायचे असल्यास मुले मराठी पुस्तके  घेतात; पण सध्याची पिढी इंग्रजी माध्यमात शिक्षण घेत आहे. काही जणांचे पालकही इंग्रजी माध्यमातून शिक लेले असतात. त्यामुळे मुलांचा कल इंग्रजीकडे असतो. आजी-आजोबा असतील तर मराठीची थोडीफार सवय लावतात.

– रुक्मिणी देसाई, ग्रंथपाल माहीम सार्वजनिक वाचनालय.