कडक सुरक्षा व्यवस्था असूनही शनिवारी पहाटे एका तरुणाने वांद्रे वरळी सागरी सेतूवरून उडी मारून आत्महत्या केली. रात्री उशीरापर्यंत त्याचा मृतदेह सापडलेला नव्हता.
   शनिवारी पहाटे सव्वा दोनच्या सुमारास पंचविशीतल्या एका तरुणाने भायखळ्याच्या खडा पारसी येथून एक टॅक्सी केली होती. वांद्रे येथे जायचे आहे असे सांगत टॅक्सी त्याने वांद्रे वरळी सागरी सेतूवरून नेण्यास सांगितली. सागरी सेतूवर टॅक्सी येताच त्याने आपल्या डोक्यातील माकड टोपी टॅक्सीबाहेर फेकली. त्यानंतर ही टोपी घेण्याच्या बहाण्याने टॅक्सी थांबवली. काही वेळाने आपल्याला उल्टी येत असल्याचे टॅक्सीचालकाला सांगून त्याने पुन्हा टॅक्सी थांबवली आणि  उडी मारली. टॅक्सी चालकाने मुख्य नियंत्रण कक्षाला माहिती दिल्यानंतर या तरुणाचा शोध सुरू झाला. तो कोण होता त्याचीही ओळख पटलेली नाही.