करोना विषाणी विरुद्धचा लढा जिंकण्यासाठी सत्तारुढ, विरोधीपक्षांसह तमाम नागरिकांची एकजूट महत्वाची आहे. हा लढा राज्य, देशांच्या सीमेपलिकडचा मानवजातीच्या अस्तित्वाचा लढा असल्याने त्यात एकजूटीने, एकाच दिशेने प्रयत्नांची गरज आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी केले.

वैयक्तिक स्वार्थ, पक्षीय मतभेद तुर्तास बाजूला ठेवून करोना विरुद्धच्या लढय़ात सर्वानी एकजूटीने प्रयत्न करावेत. राज्यातील करोना बाधितांची वाढती संख्या चिंताजनक असल्याचे सांगून यापुढचे दोन आठवडे नागरिकांनी भेटीगाठी, गर्दी टाळून घरातच थांबावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री पवार यांनी के ले.

राज्यात काम करणाऱ्या परराज्यातील मजूरांनी जीव धोक्यात घालून प्रवास करू नये, असे आवाहनही पवार यांनी केले आहे. परराज्यातील मजूरांसाठी राज्यात ठिकठिकाणी शिबिरे स्थापन करण्यात आली आहेत. मजूरांच्या गरजेनुसार आता जिथे ते आहेत त्याठिकाणी प्रशासनातर्फे निवास आणि भोजनाची मोफत सोय करण्यात येत आहे. प्रशासनाच्या बरोबरीनं स्वयंसेवी संस्था त्यासाठी योगदान देत आहेत, असे पवार यांनी सांगितले.

राज्यात शिवभोजन थाळी योजनेची व्याप्ती वाढवण्यात आली आहे. पुढचे तीन महिने शिवभोजन थाळी दहा रुपयांऐवजी पाच रुपयांना मिळणार आहे. त्यामुळे गरीबांचे पोट भरण्यास मदत होणार आहे, अशी माहितीही उपमुख्यमंत्र्यांनी दिली.