परदेशांतून स्वस्त रद्दीची आयात वाढल्याचा परिणाम निशांत सरवणकर, मुंबई कागद उत्पादन गिरणीसाठी (पेपर मिल) लागणारी रद्दी अमेरिका तसेच युरोपमधून मोठय़ा प्रमाणात आणि स्वस्तात उपलब्ध झाल्याने भारतातील रद्दीचे भाव २५ ते ३० टक्क्य़ांनी घसरले आहेत. ही विदेशी रद्दी पूर्वी चीनकडून मोठय़ा प्रमाणात आयात केली जात होती, परंतु पर्यावरण रक्षणासाठी चीनने बंदी घातल्याने या देशांनी भारताकडे मोर्चा वळविला आहे. त्याचाच हा परिणाम असल्याचा दावा केला जात आहे. देशभरात २ ऑक्टोबरपासून लागू झालेल्या प्लास्टिक बंदीनंतर कागदी पिशव्यांचे उत्पादन वाढेल, असा अंदाज होता. परंतु तोही फोल ठरल्याने भारतातील रद्दी सध्या पडून आहे. कागदी पिशव्यांचे उत्पादन वाढल्यास रद्दीची मागणी वाढून भाव पुन्हा वधारेल, असा दावा केला जात असला तरी तूर्तास पूर्वीच्या भावाने रद्दी उचलण्यास घाऊक व्यापारी नकार देत आहेत. ही रद्दी पेपर मिलला विकली जाते आणि त्यावर पुनर्प्रक्रिया करून कागद तयार केला जातो. परंतु परदेशांतून आयात केली जाणारी रद्दी या उत्पादकांना भारतीय रद्दीपेक्षा खूपच कमी दराने मिळत आहे. त्यामुळे या व्यावसायिकांकडून भारतातील रद्दीपेक्षा परदेशांतून येणारी रद्दी अधिकाधिक आयात करण्यावर भर दिला जात आहे. या क्षेत्राशी संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पर्यावरण रक्षणासाठी चीनमध्ये कागद तयार करण्यासाठी रद्दी वापरण्यावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे कागदासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या मागणीत वाढ झाली आहे. मलेशिया, इंडोनेशिया या देशांतून हा पुरवठा केला जात आहे. भारतात वापरण्यात येणाऱ्या कागदापैकी केवळ २० टक्के कागदच पुन्हा रद्दीच्या रूपाने पुनप्र्रक्रियेसाठी पोहोचतो, असे ‘इंडियन पेपर मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन’ने प्रसिद्ध केलेल्या एका सर्वेक्षणात नमूद केले आहे. याउलट विकसित देशात किमान ७५ टक्के कागद पुनप्र्रक्रियेसाठी संकलित केला जातो. परंतु आता त्यावर बंदी आल्याने अचानक भारतासारख्या देशांकडे परदेशी रद्दी मोठय़ा प्रमाणात आयात होऊ लागली आहे. त्यामुळेच देशांतर्गत रद्दीचे भाव गडगडल्याचेही या घडामोडींशी संबंधित सूत्रांनी सांगितले. मागणी कमी होण्याची कारणे *अमेरिका, युरोप आदी देशांतून प्रामुख्याने चीनमध्ये मोठय़ा प्रमाणात रद्दी निर्यात केली जात होती, परंतु अशी रद्दी आयात करण्यास चीनने बंदी घातली आहे. त्यामुळे या देशांनी भारताकडे मोर्चा वळविला आहे. *या आयातीचा दर प्रत्येक टनामागे ३०० डॉलरवरून १०० ते १२० डॉलरवर आल्यामुळे भारतातील पेपर मिल ही रद्दी आयात करण्यात धन्यता मानत आहेत. परिणामी देशातील रद्दीला खरेदीदार उरलेला नाही. *मुंबईत दररोज एक हजार टन रद्दी निर्माण होते. त्यापैकी फक्त ३०० टन रद्दीला सध्या मागणी असल्याचे पेपर रद्दी विक्रेता संघटनेचे म्हणणे आहे.