गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यात काही जिल्ह्य़ांत दुष्काळ ओढावल्याने लोकांची तडफड होत असल्याने मुंबईतील हॉटेल संघटनांनी पाण्याचा जपून वापर करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यात संघटनेकडून हॉटेलचालकांना पाणी वाचवण्याबाबत काही सूचना करण्यात आल्या आहेत. याशिवाय येत्या काही दिवसांत पाणी वाचवण्यासाठी हॉटेलमधील भिंतीवर पाणी जपून वापरण्यासंबंधी पत्रक चिकटवण्यात येणार आहे. यातून हजारो लिटर पाणी वाचवण्याचा संघटनेचा मानस असल्याचे आहार संघटनेकडून सांगण्यात आले. शहर व उपनगरात छोटे-मोठे मिळून ८ हजारांहून अधिक हॉटेल्स आहेत. यात लाखो मुंबईकरांना दिवसांतून एकदा तरी भूक भागवण्यासाठी हॉटेलचा आधार घ्यावा लागतो. हॉटेलात दिल्या जाणाऱ्या पाण्याचे मोजमाप नसल्याने हजारो लिटर पाणी वापराविना वाया जात असल्याचे चित्र आहे. यावरच तोडगा काढत आहार संघटनेने पुढाकार घेतला आहे. यात हॉटेलचालकांना पाणी वाचवण्यासाठी काही उपाय सुचवण्यात आले आहेत. यात ग्राहकांना छोटय़ा ग्लासमधून पाणी द्यावे, एक ग्लास पाणी संपल्यानंतर ग्राहकांकडून जोपर्यंत पाण्याची मागणी केली जात नाही तोपर्यंत पाणी देऊ नये आणि सुरुवातीपासूनच अर्धा ग्लास पाणीच द्यावे, अशा काही आगळ्यावेगळ्या सूचना करण्यात आल्या आहेत. मुंबईत दिवसाला ३७५० दशलक्ष लिटर पाणी पुरवले जाते. यातील साधारण २० ते २५ टक्के पाणी नेमके कुठे जाते त्याचा पत्ता लागत नाही, तर महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त गावांत एका ग्लासच्या पिण्याच्या पाण्यासाठी मैलोन्मैल पायपीट करावी लागते. याच धर्तीवर मुंबई व उपनगरातील हॉटेलचालकांना पाणी वाचवण्यासाठी उपाय सुचवण्यात आले आहेत.