दोन दिवस कोसळलेल्या पावसाचा परिणाम मुंबई : गेल्या दोन दिवसात मुंबई व आसपासच्या परिसरात पडलेल्या पावसामुळे मुंबईकरांची तहान भागविणाऱ्या तलावांतील पाणीसाठय़ात थोडी वाढ झाली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावात आता ९० टक्क्यांहून अधिक पाणीसाठा जमा झाला आहे, तरीही गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत हा पाणीसाठा कमी असून तलाव पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी अद्याप १० टक्के तूट आहे. जुलै महिन्यात मुसळधार पाऊस कोसळल्यामुळे तलावांतील पाणीसाठय़ात चांगली वाढ झाली. मात्र नंतर ऑगस्टमध्ये पावसाने ओढ दिल्यामुळे धरणातील पाण्याचा साठा वाढण्याची गती कमी झाली. महिन्याभरापासून तलाव क्षेत्रातही अगदी मोजकाच पाऊस पडत होता. मात्र सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच मुंबई, पालघर, नाशिक परिसरात चांगला पाऊस पडल्यामुळे धरणातील पाणीसाठा वाढण्याची आशा निर्माण झाली आहे. सप्टेंबरच्या अखेरीस सातही तलावांतील पाणीसाठा १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटरवर पोहोचला तरच मुंबईकरांना पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा करणे शक्य होते. १ ऑक्टोबरला तलावांतील पाणीसाठय़ाचा आढावा घेऊन तलावातील उपलब्ध पाणीसाठा ३१ जुलैपर्यंत पुरेल यादृष्टीने पालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे नियोजन केले जाते. मात्र सध्या असलेला पाणीसाठा हा गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत कमी आहे. शुक्रवापर्यंत सातही तलावात मिळून १३ लाख १४ हजार ११३ दशलक्ष लिटर म्हणजेच ९०.७९ टक्के पाणीसाठा जमा झाला. जलाशयांत किती साठा? ऊध्र्व वैतरणा ७९.७० टक्के मोडक सागर ९०.२५ टक्के तानसा ९८.८९ टक्के मध्य वैतरणा ९४.४७ टक्के भातसा ९१.३१ टक्के विहार १०० टक्के तुळशी ९९.५६ टक्के