अतिरेकी कारवाया थांबेपर्यंत पाकिस्तानशी कोणतेही संबंध ठेवू नयेत, हा सर्व देशप्रेमींचा एकमुखी आवाज देशात उमटेपर्यंत पाकचे चाळे सुरूच राहतील, असे परखड मतप्रदर्शन करीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मतांचे राजकारण करीत असताना आपण देशाचा घात तर करीत नाही, असा टोला भाजपचे नाव न घेता लगावला. पाकिस्तानी क्रिकेट संघ धरमशालाऐवजी कोलकात्त्यामध्ये २०-२० क्रिकेट सामना खेळणार आहे. हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी क्रिकेट सामन्याच्या सुरक्षेच्या कारणावरून नकार दिला असताना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यास पूर्ण सुरक्षा देण्याचे ठरविले आहे. हे अतिशय दुर्दैवी असल्याचे सांगून ठाकरे म्हणाले, देशप्रेमाची भावना देशात तीव्र होत आहे. ही समाधानाची बाब आहे.