येणाऱ्या काळात मोदी…भाजप-शिवसेना यांचा पराभव करायचा हे एकच ध्येय असले पाहिजे आणि त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस या पराभवाचं माध्यम ठरला पाहिजे असे आवाहन राष्ट्रवादीचे विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार यांनी केले. ‘चला देऊया मदतीचा हात’ या राष्ट्रवादीच्या विशेष कार्यक्रमात अजितदादा पवार बोलत होते.

आपल्यासमोर एकच ध्येय असलं पाहिजे की भाजपाचा दारुण पराभव करुन आपल्या विचाराचं सरकार आणावयाचं आहे. त्यामुळे पक्षाला अधिक वेळ द्या. कमी पडू नका.  मागे राहू नका असे सांगतानाच प्रत्येक नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी पक्षासाठी झोकून द्यायच आहे. तसं काम करुन राज्यात ताकदीने राष्ट्रवादी काँग्रेसला निवडून आणा असे आवाहनही अजितदादा पवार यांनी केले.

यावेळी अजितदादा पवार यांनी कार्यकर्त्यांना मूलमंत्रही दिला. काहीवेळा पक्षाला काही जागा सोडाव्या लागतील त्यावेळी नाराज न होता येत्या काळात सत्ता आणावयाची आहे हे लक्षात ठेवा. जो त्याग करेल त्याचा विचार पक्ष नक्कीच करेल असेही स्पष्ट केले.

याचवेळी अजितदादा पवार यांनी भाजप सरकार आणि मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा असा कारभार भाजपाचा सुरु आहे. देशात अराजकता आणि हुकुमशाही सुरु आहे. सत्तेचा दुरुपयोग माझ्या आयुष्यात मी पाहिला नाही इतका दुरुपयोग भाजप सरकारने केला आहे.त्यामुळे केंद्रात आणि राज्यात सत्ता आणावयाची आहे ही खूणगाठ बांधावयाची आहे असे आवाहनही अजितदादा पवार यांनी केले.

पक्षाचे अध्यक्ष शरद पवारसाहेबांनी शिक्षणाची वेगवेगळी कवाडं उघडण्याचं काम केले.ज्या-ज्यावेळी चांदयापासून ते बांदयापर्यंत महाराष्ट्र अडचणीत आला त्या-त्यावेळी पवारसाहेब मदतीला धावून आले आहेत.वेगवेगळया घटकांना सोबत घेवून जाण्याचे विचार पवारसाहेबांनी आपल्याला दिले असल्याचे अजितदादा पवार यांनी आपल्या भाषणात सांगितले. सुरुवातीला अजितदादा पवार यांनी पवार साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर बुथ कमिटयांचे चांगले काम केलेल्या पदाधिकाऱ्यांचे खास अभिनंदन केले.