मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन भारतातील पूर्वीची शिक्षणव्यवस्था परिपूर्ण होती, परंतु परकीयांनी पुरोगामित्व व आधुनिकतेचे चित्र निर्माण करत नवी शिक्षणपद्धती आपल्यावर लादली आहे. दुर्दैवाने आजही तीच शिक्षणपद्धत चालू असून त्याच्या प्रभावामुळे देशी ते बुरसटलेले व पाश्चात्य म्हणजे आधुनिक असा समज रुजवण्यात आला आहे. राजकारणात स्वत:चे प्रभुत्व ज्यांना निर्माण करता आले नाही अशांनी शिक्षण, साहित्य, इतिहास व माध्यमांच्या जोरावर हा समज पसरवला आहे,’ अशा शब्दांत पाश्चात्य शिक्षणामुळे ‘देशी’ शिक्षणव्यवस्थेला कसा धक्का बसला आहे, याचे जोरदार प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ‘आपण ज्या विचारांचे पाईक आहोत त्याचा अभिमान बाळगायलाच पाहिजे. देशात पूर्वी भेदभाव नव्हता, इंग्रजांच्या शिक्षणाने तो पसरला. राजकारणात स्वत:चे प्रभुत्व ज्यांना निर्माण करता आले नाही अशांनी शिक्षण, साहित्य, इतिहास व माध्यमांच्या जोरावर हा समज पसरवला आहे. त्यामुळे शिक्षणव्यवस्थेलाच धक्का बसला असून यातून सावरण्याची गरज आहे,’ असे सांगत पाश्चात्य विरोधात देशी शिक्षण या वादाला तोंड फोडले. आपला मुद्दा मांडण्यासाठी त्यांनी भारतात १८५७च्या काळात कशी बारा हजार संस्कृत विद्यालये होती, हे ब्रिटिश सरकारनेच केलेल्या अभ्यासाचा आधार घेत सांगितले. हा अभ्यास अहवाल ‘आँटोरिओ रिसर्च इन्स्टिटय़ूशन’मध्ये उपलब्ध आहे. या विद्यालयांमध्ये एक लाखांहून अधिक विद्यार्थी त्यात शिक्षण घेत होते. त्याच वेळी संपूर्ण इंग्लंडमध्ये फक्त दोन हजार शाळा होत्या, असे त्यांनी या अहवालाच्या आधारे सांगितले. आजवरच्या शैक्षणिक धोरणावर कठोर टीका करीत त्यांनी मॅकॉलेप्रणीत इंग्रजी शिक्षण पद्धतीचे दोष दाखविले. आपली मूळ शिक्षण पद्धती ब्रिटिशांनी मोडून काढली व भारतविरोधी पद्धती लादली. त्यामुळे इथला मूळ विचार बिघडविला, अशी मांडणी करत त्यांनी भारतातील टोकाच्या सामाजिक विषमतेचे खापर इंग्रजांवर फोडले. ‘अ.भा.वि.प.मध्ये काम करतानाचे दिवस मंतरलेले होते. समाजासाठी वाहून घेणारे कार्यकर्ते अ.भा.वि.प.च निर्माण करू शकते. त्यासाठी लागणारे तरुण नेतृत्व भारतात उपलब्ध असून फक्त त्यांना योग्य दिशा देण्याची गरज आहे,’ असेही ते पुढे म्हणाले. वांद्रे रिक्लेमेशन येथे सुरू असलेल्या अ.भा.वि.प.च्या ५०व्या अधिवेशनादरम्यान शुक्रवारी आयोजित केलेल्या पूर्व-कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. विविध क्षेत्रांत कार्यरत असणारे अ.भा.वि.प.चे कार्यकर्ते मेळाव्याला उपस्थित होते.