सरत्या वर्षांला निरोप देत नववर्षांच्या स्वागतासाठी ३१ डिसेंबरला रात्री उशिरापर्यंत उपनगरातून दक्षिण मुंबईत आणि मुंबईतून उपनगरात येणाऱ्या प्रवाशांची परतीच्या प्रवासात गैरसोय होऊ नये यासाठी पश्चिम रेल्वेने आठ विशेष लोकल गाडय़ा सोडण्याचा निर्णय घेतला आहे. अप मार्गावर चार तर डाऊन मार्गावर चार विशेष सेवा चालवण्यात येणार आहेत.
३१ डिसेंबरला पश्चिम रेल्वेवर चर्चगेट आणि विरार स्थानकादरम्यान अप-डाऊन मार्गावर आठ विशेष गाडय़ा सोडल्या जातील.
यात चर्चगेटहून विरारला जाण्यासाठी रात्री. १.१५, १.५५, २.२५ आणि ३.२० वाजता तर विरारहून चर्चगेटला जाण्यासाठी रात्री १२.१५, १२.४५, १.४० आणि २.५५ वाजता सोडण्यात येणार आहेत.
रेल्वेप्रमाणे बेस्ट प्रशासनाकडूनही १७ विशेष जादा बसगाडय़ा सोडण्यात येणार आहेत. यात गेटवे ऑफ इंडिया, जुहू चौपाटी, गोराई बीच आणि मुंबईतील इतर चौपाटीलगत मार्गावर या बसगाडय़ा चालवण्यात येणार आहेत. यात बस क्रमांक १ मर्या., ७ मर्या., १११, ११२, २०३, २३१, २४७, २७२ आणि २९४ आदी बसगाडय़ांचा समावेश आहे.
या गाडय़ा रात्री दहा वाजल्यापासून सोडण्यात येणार असल्याचे बेस्ट प्रशासनातर्फे सांगण्यात आले.