मुंबईतील गणेशोत्सव विसर्जनाच्या मिरवणुका पाहण्यासाठी अगदी परदेशातूनही लोक येत असतात. मात्र मुंबईच्या दुसऱ्या टोकाला राहणाऱ्यांना हा सोहळा पाहून आपल्या घराकडे सुखरूप परतता यावे, यासाठी पश्चिम रेल्वेने अनंतचतुर्दशीच्या रात्री चर्चगेट-विरार या दरम्यान आठ विशेष गाडय़ा चालवण्याचा निर्णय घेतला़
चर्चगेटहून विरारला जाणारी पहिली गाडी ८ आणि ९ सप्टेंबरच्या मध्यरात्री १.१५ वाजता सुटेल. ही गाडी विरारला २.४७ वाजता पोहोचेल. दुसरी गाडी १.५५ वाजता सुटून ३.३० वाजता, तिसरी गाडी २.२५ वाजता सुटून चार वाजता आणि चौथी विशेष गाडी ३.२०ला चर्चगेटवरून निघून ४.५५ वाजता विरारला पोहोचेल. तर विरारहून मुंबईकडे निघणारी पहिली विशेष गाडी ००.१५ वाजता निघून १.४५ वाजता पोहोचेल. दुसरी गाडी ००.४५ वाजता विरारहून रवाना होणार असून २.१७ वाजता चर्चगेटला पोहोचेल. तिसरी व चौथी गाडी अनुक्रमे १.४० आणि २.५५ वाजता विरारहून निघून ३.१२ आणि ४.३० वाजता चर्चगेटला पोहोचतील. या सर्व विशेष गाडय़ा धिम्या आहेत.