एम.करुणानिधी यांच्या निधनाने आज संपूर्ण तामिळनाडू शोकसागरात बुडाला आहे. करुणानिधी फक्त तामिळनाडूच नाही तर देशातील दिग्गज राजकीय नेते होते. देशाच्या पंतप्रधानांपासून ते विविध पक्षांच्या प्रादेशिक नेत्यांबरोबर त्यांचे घनिष्ठ संबंध होते. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या बरोबर सुद्धा करुणानिधी यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते. १९६८ साली करुणानिधी मुंबई दौऱ्यावर आलेले असताना त्यांनी शिवसेनाप्रमुखांची भेट घेतली होती. शिवसेनाप्रमुख स्वत: ओबेरॉय हॉटेलमध्ये जाऊन त्यांना भेटले होते. २०१२ साली शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर त्यांना श्रद्धांजली वाहताना करुणानिधी यांनी बाळासाहेबांबरोबरच्या भेटीच्या आठवणी जागवल्या होत्या. मी हॉटेल ओबेरॉयमध्ये उतरलो होतो. त्यावेळी बाळासाहेब मला भेटायला आले होते. आमच्यामध्ये प्रदीर्घ चर्चा झाली. आमच्यामध्ये मतभेद असले तरी त्यांचे प्रेम आणि साधेपणा मला प्रचंड भावला होता असे करुणानिधी म्हणाले होते. महाराष्ट्रातील जनतेच्या भल्याचा विषय असेल तर त्यावर बाळासाहेब कधीच तडजोड करणार नाहीत असे करुणानिधी म्हणाले होते.