अवनी वाघिणीची शिकार करण्यात आली. त्यानंतर आता ही शिकार नियमानुसार केली का नाही याची चौकशी करण्यासाठी जी समिती नेमली आहे तो एक फार्स आहे. ज्या लोकांनी अवनीच्या शिकारीची सुपारी दिली त्यांनाच या कमिटीवर नेमण्यात आले आहे. निवृत्त न्यायाधीशांमार्फत कमिटी बनवून या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

सुधीर मुनगंटीवार यांनी काही वाघिणीला गोळ्या घातल्या नाहीत अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वनमंत्र्यांची पाठराखण केली मग सर्जिकल स्ट्राईक काय मोदींनी केला होता ? मग त्याचं श्रेय कसं घेतलं. मग ह्या पापाचे धनी तुम्ही होणार का ? या शब्दात उद्धव ठाकरे यांनी टीका केली.

पाच हजार शेतकरी कुटुंबांना शिवसेनेचा मदतीचा हात
महाराष्ट्र सध्या दुष्काळाच्या छायेत आहे. मराठवाडा विदर्भ भागातील शेतकरी कुटुंबाची या दुष्काळामुळे दयनीय अवस्था आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर दुष्काळाच्या झळा शेतकरी कुटुंबाना बसत आहेत. अशा दुष्काळाच्या छायेत असणाऱ्या पाच हजार शेतकरी कुटुंबांना शिवसेनेने मदतीचा हात दिला आहे. अमरावती, बुलढाणा, परभणी, औरंगाबाद, अकोला, हिंगोली, जालना, बीड , लातूर, वाशीम, नांदेड, उस्मानाबाद, आणि यवतमाळ येथील शेतकरी कुटुंबाना १५ किलो गहू आणि तांदूळ, पाच लिटर गोडेतेल, पाच किलो साखर, तीन किलो डाळ, दोन किलो रवा आणि मैदा, तीन किलो डालडा, उटणं आणि साबण अशा दिवाळी आणि गृहपयोगी वस्तू आज पाठवण्यात आल्या आहेत.